लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी
प्रतिनिधी /कुडचडे
आज सिद्धी नाईक या युवतीचा मृत्यू होऊन अनेक दिवस उलटले आहेत. तरी तिला कसा मृत्यू आला, तिने आत्महत्या केली की, तिची हत्या झाली याचा छडा लावण्यात अजूनपर्यंत पोलीस खात्यास यश आलेले नाही. सिद्धीला न्याय मिळणे आवश्यक असून यात जो कोणी दोषी आहे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, अशी मागणी कुडचडेत रविवारी रात्री काढण्यात आलेल्या मेणबत्ती फेरीत सहभागी झालेल्या केनिडा या महिलेने केली.
आज राज्यात लागोपाठ विविध प्रकारचे गुन्हे होत असून यावर नियंत्रण का येत नाही याचे जनतेला स्पष्टीकरण मिळाले पाहिजे. जर अशा प्रकारचे गुन्हे होत राहिले, तर राज्यात महिला सुरक्षित कशा राहणार हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी पोलीस खाते जास्त सक्रिय होणे गरजेचे आहे, असे मत केनिडा यांनी व्यक्त केले. सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणी न्याय मिळावा यासाठी कुडचडे येथील युवक, युवती, महिला तसेच अन्य पालकांनी सहभागी होऊन मेणबत्ती फेरी काढण्यात आली. ही फेरी कुडचडे रेल्वे स्टेशन ते आंबेडकर सर्कलदरम्यान काढण्यात आली.
या प्रकरणी न्याय हा मिळालाच पाहिजे. तसेच राज्यात अशा घटना परत घडू नयेत यासाठी जनतेची देखील जबाबदारी बनते. सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणात न्याय मिळेपर्यंत राज्यातील प्रत्येक महिलेने त्यासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन फेरीत सहभागी झालेल्या अन्य एका व्यक्तीने केले. राज्यात महिलांवर अत्याचार वाढत आहेत. कायदामंत्र्यांनीही सिद्धी नाईक प्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आदित्य देसाई यांनी यावेळी केली.








