महाआवास अभियानात राज्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून होणार सन्मान
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात महाआवास अभिमान 2020-21 मध्ये सातारा जिल्हा परिषदेने पुरेशी जागा नसल्यास बहुमजली इमारत बांधणे व पुरेशी जागा असल्यास ग्रह संकुल उभारणे या दोन्ही प्रकारात राज्यात द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. तर पाटण तालुक्यातील नाव या गावाने राज्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी 3 वाजता मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाहीर कार्यक्रमात होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी ज्यांना घर नाही त्यांना घरकुल कसे मिळेल यासाठी प्राधान्य दिले. त्याच वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआवास योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात अशा सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, जिह्यात महाआवास योजना राबविण्यासाठी मध्यतरीच्या काळात जिल्हा परिषदेला प्रकल्प संचालक हे पद रिक्त होते. त्याच काळात तातकालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी त्या विभागाचा पदभार घेऊन चांगले काम केले. सध्या असलेल्या प्रकल्प संचालक संगीता देसाई यांच्या कार्यकाळात अचानक जिल्हा परिषदेचा तब्बल दोन राज्य पातळीवरचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर कर्मचारी म्हणून एक आणि ग्रामपंचायतीला एक असे चार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुरेशी जागा नसल्यास बहुमजली इमारत बांधणे या प्रकारात सातारा जिल्हा परिषदेने द्वितीय क्रमांक तर पुरेशी जागा असल्यास ग्रह संकुल उभारण्यात द्वितीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच विशेष पुरस्कारामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे डेटा एन्ट्री ऑपरेटर अमर शेडगे याला पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्यात सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार पाटण तालुक्यातील नाव या गावाला जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. 24 रोजी दुपारी 3 वाजता मुंबई येथील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह नाव गावचे ग्रामसेवक, डेटा ऑपरेटर अमर शेडगे आदी मान्यवर जाणार आहेत.








