माणसाला सर्वाधिक आकर्षण सोन्याचे आहे. सुवर्ण किंवा सोने हे प्रतिष्ठा आणि श्रीमंती यांचे तर द्योतक आहेच पण ते धर्म, संस्कृती आणि अर्थकारणाशीही जोडले गेले आहे. सांप्रतच्या काळातही एखाद्या देशाच्या चलनाची किंमत निर्धारित करण्याचे जे अनेक निकष आहेत. त्यांच्यात सुवर्णाचे स्थान वरचे आहे. एखाद्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे सोन्याचा साठा किती आहे, यावर त्या देशाच्या चलनाची पत ठरत असते. याचाच अर्थ असा की कोणत्याही देशाची आर्थिक प्रतिष्ठा त्याच्यापाशी असलेल्या सोन्याच्या प्रमाणात निर्धारित केली जाते.
जगात आज भूमीवरचे सोने किती आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. यासंबंधी नुकतेच एक संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाच्या निष्कर्षांच्या अनुसार जगात आज उपयोगात असलेला सुवर्णसाठा 2 लाख 16 हजार 265 टन, अर्थात साधारणत: 22 कोटी किलो इतका आहे. त्याची सांप्रतची किंमत भारतातील बाजारभावाप्रमाणे साधारणत: 20 कोटी कोटी रुपये होते. याचाच अर्थ असा ही किंमत भारताच्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आकाराच्या चाळीस पट इतकी आहे. याखेरीज जवळपास याच्या दुप्पट सोने अद्यापही पृथ्वीच्या पोटात आहे. ते उत्खनन करण्यात आलेले नाही. आपल्या भारतातही सर्वांकडचे सोने एकत्र केले तर ते 1.5 कोटी किलोपेक्षा अधिक होईल. त्याची किंमत 1.27 कोटी कोटी रुपये होईल. भारतावर सध्या जितके विदेशी कर्ज आहे, त्याच्या साधारणत: दुप्पट ही रक्कम होते. याचाच अर्थ सर्व भारतीयांनी निर्धार केला, तर आपल्याकडील अर्धे सोने देशाला देऊन ते देशाचे सर्व विदेशी कर्ज एका तडाख्यात फेडू शकतात, अशी ही स्वारस्यपूर्ण माहिती आहे.









