कोलकाता / वृत्तसंस्था
भारत-ऑस्ट्रेलियाचे संघ या वर्षाच्या उत्तरार्धात आमनेसामने भिडतील, त्यावेळी भारतीय गोलंदाज स्टीव्ह स्मिथसारख्या अपारंपरिक शैलीच्या फलंदाजाला रोखण्यासाठी कोणती रणनीती अंमलात आणणार, याची आपल्याला उत्सुकता आहे, असे प्रतिपादन माजी इंग्लिश कर्णधार मायकल आथरटनने केले. भारतीय संघाने यापूर्वी 2018-19 मध्ये कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकत ऑस्ट्रेलियन भूमीत पहिलावहिला, ऐतिहासिक विजय जरुर संपादन केला. पण, त्यात डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ या दोन्ही अव्वल खेळाडूंचा समावेश नव्हता. त्या पार्श्वभूमीवर यंदाची मालिका अधिक रंगतदार, चुरशीची होईल, असे आथरटनलाही वाटते.
‘जेव्हा खेळाडू अपारंपरिक शैलीने खेळतात, अशा प्रकाच्या शैलीवर भर देतात, त्यावेळी ते अधिक अनाकलनीय ठरतात. पण, अशा खेळाडूंमुळेच खेळात रंगत वाढते. स्टीव्ह स्मिथची शैली खूप वेगळी आहे. तो कोणत्याच पारंपरिक पठडीत बसत नाही. त्यामुळे, भारतीय गोलंदाजांची लाईनअप त्याच्याविरुद्ध काय रणनीती आखणार, याचे मला अधिक औत्सुक्य आहे’, असे आथरटन म्हणतो. भारताच्या गोलंदाजी लाईनअपमध्ये जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांच्यासारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज असून यामुळे भारतीय गोलंदाज व ऑस्ट्रेलियन फलंदाज यांच्यात अधिक रस्सीखेच रंगणे अपेक्षित आहे.
इंग्लंडतर्फे 54 कसोटी खेळणाऱया आथरटनने यावेळी भारताच्या जलद गोलंदाजी लाईनअपची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘सध्या भारताने जे अव्वल दर्जाचे जलद गोलंदाज निर्माण केले आहेत, त्याला दुसरी तोड नाही. मी स्वतः भारताविरुद्ध 1993 मध्ये खेळलो, त्यावेळी त्यांचा सर्व भर फिरकी गोलंदाजीवरच असायचा, हे अनुभवले आहे’, असे तो येथे म्हणाला.
‘स्मिथसारखे अपारंपरिक शैलीचे फलंदाज या खेळात आणखी जान भरतात. याशिवाय, रोहित शर्माची विस्फोटक फलंदाजी ऑस्ट्रेलियातील तुलनेने जलद खेळपट्टय़ांवर अधिक बहरेल’, अशी अपेक्षा आथरटनने येथे व्यक्त केली. सध्या इंग्लंड दौऱयावर असलेल्या विंडीज संघाने धावफलकावर उत्तम धावा नोंदवल्या तरच त्यांना लढण्याची संधी असेल, असे तो शेवटी म्हणाला.









