पूर्ण बहुमत मिळवून भाजपचेच सरकार स्थापन होणार : निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
प्रतिनिधी /पणजी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची महाआघाडीचा प्रस्ताव दिला असला आणि महाआघाडी झाली तरी त्याचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा भाजपचे गोवा निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
काल बुधवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, भाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधकांची महाआघाडी करण्याचा प्रयत्न चालविला होता, परंतु तो फसला आणि त्यात त्यांना अपयश आले. गोव्यातही तेच घडणार असून त्यांनी विरोधकांची आघाडी जरी केली तरी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून भाजपचे सरकार स्थापन होईल, अशी खात्री फडणवीस यांनी वर्तविली.
भाजपची ताकद विरोधकांना समजली
विरोधी पक्ष एकत्र येऊ पहातात किंवा त्यांना एकत्र आणून आघाडीचे प्रयत्न होतात याचा अर्थ त्यांना भाजपची ताकद समजली आहे. परंतु तो प्रयत्न यशस्वी होणार नाही आणि झाला तरी भाजपला त्याची कोणतीही फिकीर व काळजी करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
उमेदवारी नाकारल्याने काहींनी भाजप सोडला
ज्यांना भाजपची उमेदवारी नाकारली जाणार हे समजले त्यांनी भाजप सोडला आणि ज्यांना भाजपची ताकद समजली ते भाजपमध्ये सामील होत असल्याचे निवेदन फडणवीस यांनी केले. जे उमेदवार म्हणून निवडून येण्याची खात्री आहेत त्यांनाच भाजपमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
लोबोंना उमेदवारी नाकारल्याने ते काँग्रेसमध्ये
लोबो यांना स्वतःसह पत्नीला देखील उमेदवारी हवी होती. ती भाजप देणार नाही हे समजल्यानंतर त्यांनी भाजपला रामराम केला. आता त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
पंजाब राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जे काही घडले ते निषेधार्ह असून पंजाब सरकारने त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा ठपका फडणवीस यांनी ठेवला. पंजाब सरकारची कृती पूर्णपणे चुकीची असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
चांगले काम असल्यास उत्पलच्या नावाचा विचार
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे गोवा भाजपच्या वाटचालीत मोठे योगदान आहे यात शंकाच नाही. त्यांचा मुलगा म्हणून उत्पल पर्रीकर यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देता येत नाही, त्यांचे काम चांगले असल्यास पक्ष त्यांच्या नावाचा निश्चितच विचार करील. जिंकण्याची क्षमता आणि इतर निकष लावून उमेदवारी ठरवण्यात येते. ती उमेदवारी पक्षाचे संसदीय मंडळ ठरवते. भाजप नेत्यांचा मुलगा आहे म्हणून उमेदवारी हा निकष होऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.









