काँग्रेस नेते ऍड.यतीश नाईक यांचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
प्रचंड वेगाने वाढणारी कोरोना बाधित आणि बळींची संख्या अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून सोडणारी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते ऍड. यतीश नाईक यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या या गंभीर समस्येवर उपाय म्हणून आणखी वेळ न दवडता मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने लसीकरण मोहिमेस अधिक व्यापक रूप देऊन सर्वाधिक लोकसंख्या लसीद्वारे सुरक्षित होईल यादृष्टीने पावले उचलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्याशिवाय 18 ते 45 वयोगटातील युवकांसाठीही लसीकरण मोहीम त्वरित सुरू करावी. आवश्यक तेथे शहर आणि ग्राम पातळीवरही लसीकरण केंद्रे सुरू करावी, असे ऍड. नाईक यांनी सूचविले आहे.
राज्यात कोरोनाबळींची संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. मंगळवारी तर आतापर्यंतचे सर्वाधिक 75 बळी गेले आहेत. लोक आपले अमुल्य प्राण गमावत आहेत. हे चित्र मन सुन्न करणारे, वेदनादायी आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी त्वरेने पावले उचलताना राज्यासाठी जास्तीत जास्त लसी उपलब्ध होतील व ती सर्वांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न करावे, असे ऍड. नाईक यांनी म्हटले आहे.









