- न्यू आर्या फाऊंडेशनचे रक्तदान शिबिर संपन्न
ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी रक्तसाठ्याची कमतरता कायम आहे. राज्याकडे पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रक्तासाठी फिरावे लागत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्यामुळे नागरिक आवश्यक कामानिमित्तच बाहेर पडत आहे. या काळात ऐच्छिक रक्तदान शिबिरातून मदतीचा आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न अनेक संस्थांच्या वतीने केला जात आहे.
रक्तदान ही आजची गरज लक्षात घेऊन न्यू आर्या फाऊंडेशनच्या वतीने धायरी येथील चाकणकर कॉर्नर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धायरी परिसरातील लोकांनी रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले. शिबिराला ससून रुग्णालयाची रक्तपेढी उपलब्ध करून देण्यात आली होती.
शिबिराचे महत्त्व अधोरेखित करताना न्यू आर्या फाऊंडेशनचे संस्थापक संतोष कदम म्हणाले, कोरोनाच्या नाजूक परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी आणि विचारपूस करून रक्त घेण्यात आले. यावेळी अनेक लोकांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे रक्तदान करता आले नाही. परंतु पहिला प्रयत्न असून पंचवीस लोकांनी रक्तदान केले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात रुग्णांना तत्काळ रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आर्या फाऊंडेशनने हे शिबिर आयोजित केले होते.
रक्तदान हे जीवदान असते. या काळात रक्तदान करणारे नागरिक खरे योद्धे वाटतात. रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे. रक्तदाते रक्तदान करून माणुसकीचे बंध दृढ करत आहे. या काळात समाजातील परस्परांतील वाद विवाद विसरून एकजुटीने उभे राहणे गरजेचे आहे. महामारीच्या काळात अनेकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे. परंतु अनेक लोकांचे प्राण रक्तदानामुळे वाचू शकतात, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान आणि प्लाज्मादान करून देशासमोरील या संकटाला एकीने समोर जाऊ, असे आवाहन संस्थापक संतोष कदम यांनी केले आहे.








