प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेली 11 वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग कामाबाबत मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण आणि रस्ते आस्थापन कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपुर येथे भेट घेतली. महामार्गाच्या कामाची गती वाढवण्यासाठी ज्यांच्यामुळे रस्ता रखडला त्या दोन ठेकेदाररांना बदलण्याचे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले.
मनसे रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी मागच्या काही महिन्यांत महामार्गाबाबत कोकणवासियांना जागृत व बोलते केले होते. मुंबई-गोवा महामार्गाचे मुख्य अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्याशी सातत्याने चर्चा, आंदोलने केली. याच विषयावर मनोज चव्हाण आणि योगेश चिले यांनी नितीन गडकरी यांची थेट भेट घेत याबाबत चर्चा केली.
हा आपला शब्द आहे…!
काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाप मी निस्तरतोय, पण या रस्त्यावर माझे वैयक्तिक लक्ष आहे. कोकणाला लवकरात लवकर चांगला रस्ता देणार हा माझा शब्द आहे, कामाची गती वाढवण्यासाठी ज्यांच्यामुळे हा रस्ता रखडला त्या दोन ठेकेदारांनी बदलणार आहे.
– नितीन गडकरी,
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री









