उपमुख्यमंत्री अजित पवारांची पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती
प्रतिनिधी /मुंबई
सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहेत. मराठी भाषिकांसंदर्भातील कर्नाटक सरकारची कृती अन्यायपूर्ण आणि मानवताविरोधी आहे. त्यामुळे मराठी बांधवांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून सीमाभागातील मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती सीमाभागातील मराठी बांधव तसेच माझी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कळविले आहे.
अजित पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह सीमाभागातील मराठी बांधवांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य असावे हे महाराष्ट्रवासियांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने त्यासाठी लढा सुरू राहणार आहे. सीमाप्रश्नाची लढाई सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने महाराष्ट्राचाच विजय होणार असल्याची खात्री पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा आणि मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सीमाभागातील मराठी भाषिक आज लाखो पत्रे लिहून न्याय देण्याची विनंती करत आहेत. तशीच विनंती महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने आपण करत असून सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.









