तणाव अधिक असल्यास चिप्स, आईस्क्रीम, फास्टफूडला पसंती
आनंदी असल्यास सॅलड, अंडे खाण्यावर भर
लोक मानसिक तणावाने ग्रस्त असताना चिप्स, आईस्क्रीम आणि पिझ्झा खाणे अधिक पसंत करतात. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. मानसिक अवस्था भोजनाच्या निवडीत भूमिका बजावतात की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. भोजनाच्या निवडीमागील कारण कोणते हे समजून घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे. हे संशोधन 12 आठवडय़ांपर्यंत 67 तणावग्रस्त लोकांवर करण्यात आले आहे.

बहुतांश लोक तणावाखाली असताना आईस्क्रीम, पिझ्झा, हॅमबर्ग, सॉसेज आणि अधिक मीठयुक्त चिप्स खाणे पसंत करतात. तर आनंदी असताना सॅलड, भाज्या, अंडी आणि मासे यासारखा आहार निवडतात. या लोकांना सातत्याने आनंदी ठेवण्यात आले असता ते साध्या भोजनाकडे वळल्याचे दिसून आले.
साधे भोजन प्रकृतीसाठी उत्तम असण्यासह अन्य खाद्यपदार्थांच्या तुलनेत 20 टक्के स्वस्त असल्याचे समजल्यावर या लोकांचा प्रसन्नपणा अधिकच वाढला आहे. उत्तम भोजनासह ते व्यायामाच्या दिशेनेही प्रेरित झाले आहेत. पोटातील मायक्रोब न्यूरोट्रान्समिटर निर्माण करतात. यामुळे सेरोटोनिन आणि डोपामाइन तयार होतात. ते पोटाचा मेंदूशी संपर्क साधतात. यातूनच आनंदीपणा आणि मानसिक संतुलनाला बळ मिळते. शरीरात असे मायक्रोब पुरेसे असल्यास माणूस चांगल्या आहाराच्या दिशेने आकर्षित होतो. नुकसानकारक गोष्टींपासून दूर पळू लागतो. चांगल्या कामासाठी प्रेरित होतो. तर मायक्रोब्स कमी झाल्यावर गोड, चटपटीत फास्टफूडच्या दिशेने वळतो, इतरांबद्दल उदासीन राहत असल्याचे हार्वर्डच्या संशोधन अहवालात म्हटले आहे.









