भारत-न्यूझीलंड डब्ल्यूटीसी फायनल – एकाही चेंडूचा खेळ नाही, वरुणराजाने विश्रांती घेतली तरच खेळ शक्य
साऊदम्प्टन / वृत्तसंस्था
भारत-न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल लढतीच्या पहिल्या दिवशी संततधार पावसामुळे अगदी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. दिवसभरात सातत्याने खेळपट्टीचे निरीक्षण करणाऱया पंचांनी ब्रिटीश प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3 वाजता दिवसाचा खेळ रद्द करावा लागत असल्याची घोषणा केली. या सामन्यासाठी सहावा दिवस राखीव असून तेथे आवश्यकतेनुसार, 6 तासांचा खेळ होऊ शकतो.
शुक्रवारी सकाळपासूनच साऊदम्पटनवर पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे नाणेफेक उशिराने होणार असल्याचे फलक झळकले. ग्राऊंड्समनचे पथक पूर्ण ताकदीने प्रयत्नशील होते. मात्र, संततधार थांबत नसल्याने ड्रेनेज सिस्टीम कितीही उत्तम असली तरी खेळ सुरु होणे अशक्य होते. मैदानी पंच मायकल गॉफ व रिचर्ड इ†िलंगवर्थ यांनी अखेर दुपारी 3 वाजता खेळ रद्दची औपचारिक घोषणा केली.
हा सामना साऊदम्प्टनमध्येच का घेतला गेला, यावर सध्या बरीच चर्चा सुरु असली तरी हा निर्णय घेताना ईसीबी व आयसीसीने बीसीसीआयला विश्वासात घेतले होते, असे संकेत आहेत. साऊदम्प्टनमधील एजिस बॉल स्टेडियमच्या परिसरातच फाईव्ह स्टार फॅसिलिटी उपलब्ध असल्याने ‘टाईट बायो-बबल’ला मदत मिळेल, या उद्देशाने हा सामना येथे खेळवण्याचे निश्चित केले गेले होते.
इंग्लिश हवामान नेहमीच लहरी स्वरुपाचे रहात आले आहे आणि त्यामुळे हा सामना इंग्लंडमधील आणखी कोणत्याही शहरात खेळवला गेला असता तरी पहिल्या दिवसाच्या खेळात पावसाचा व्यत्यय आला असता, असे तेथील स्थानिक हवामानावरुन दिसून आले आहे.
मागील 5 वर्षात इंग्लंडने 32 कसोटी सामने खेळले असून त्यातील केवळ 4 सामने अनिर्णीत राहिले आहेत. याशिवाय, या लढतीत सहावा दिवस राखीव असल्याने, उर्वरित कालावधीत पावसाने विश्रांती घेतल्यास भारत-न्यूझीलंड यांच्यातील लढत आताही निकाली होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे प्रथमदर्शनी चित्र आहे.









