वृत्तसंस्था/ अबु धाबी
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या दुसऱया टप्प्यात रविवारी चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. या सामन्यात खेळपट्टी उसळत्या गोलंदाजीला अधिक साथ देत असल्याने कोलकाता संघातील वेगवान गोलंदाज वरूण चक्रवर्ती चेन्नई संघासाठी डोकेदुखी ठरू शकेल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.
आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू झाल्यानंतर चेन्नाई आणि कोलकाता या दोन्ही संघांनी आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकत विजयी घोडदौड कायम राखली आहे. आता हे दोन्ही संघ रविवारच्या सामन्यात विजयाची हॅट्ट्रीक नोंदविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कोलकाता संघातील वेगवान गोलंदाजी वरूण चक्रवर्ती हा मुळचा चेन्नईचा असून चेंडू अधिक उसळण्याची शक्यता असल्याने त्याला अधिक लाभ मिळू शकेल. चेन्नईच्या फलंदाजांना चक्रवर्तीपासून सावध रहावे लागेल. चेन्नई संघातील सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याची फलंदाजी दमदार होत आहे. गायकवाड, डु प्लेसिस, अंबाती रायडू, कर्णधार धोनी, अष्टपैलू रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर आणि ड्वेन ब्रॅव्हो हे या संघातील आक्रमक फलंदाज आहेत.
कोलकाता संघाने या स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यात बेंगळूर आणि विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स संघांना पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. चेन्नई संघाने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी तर त्यानंतर दुसऱया सामन्यात बेंगळूर संघाचा 7 गडय़ांनी पराभव केला. स्पर्धेच्या गुणतक्त्यात चेन्नईचा संघ कोलकाता संघाच्या तुलनेत अग्रस्थानावर आहे. चेन्नई संघाने 9 सामन्यांतून 14 गुण घेतले आहेत. कोलकाता संघाने 8 सामन्यांतून 8 गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे. मुंबई संघाविरूद्ध चेन्नईच्या गायकवाडने नाबाद 88 धावांची खेळी केली. तसेच बेंगळूर संघाविरूद्ध त्याने जलद 38 धावा झोडपल्या. डु प्लेसिस आणि गायकवाड या सलामीच्या जोडीने चेन्नई संघाच्या डावाला चांगली सुरूवात करून दिली असल्याने कर्णधार धोनीने या जोडीमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आक्रमक खेळावर अधिक भर देत विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करील. कोलकाता संघात वरूण चक्रवर्ती, अष्टपैलू रस्सेल, फर्ग्युसन, सुनील नरेन आणि प्रसिद्ध कृष्णा हे महत्त्वाचे गोलंदाज आहेत. 2014 आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता संघाने जेतेपद पटकाविताना सलग 9 सामने जिंकले होते. यावेळी या स्पर्धेच्या भारतात झालेल्या पहिल्या टप्यात कोलकाता संघाला झगडावे लागले होते. पण दुसऱया टप्प्यात त्यांनी मुंबई इंडियन्स आणि बेंगळूर या संघांचा पराभव केला. कोलकाता संघातील वेंकटेश अय्यर याची फलंदाजी बहरल्याचे जाणवते. बेंगळूरविरूद्ध सामन्यात अय्यरने 27 चेंडूत 41 तर मुंबई विरूद्ध 30 चेंडूत 53 धावा जमविल्या होत्या. शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनाही फलंदाजीचा सूर मिळाल्याचे जाणवते.









