जनता हतबल, कोरोना प्रादुर्भावाचा ठेकेदार उठवतोय गैरफायदा
प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर ते चिपळूण दरम्यानच्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखली ते मार्गताम्हानेपर्यंत करण्यात आलेल्या कामामध्ये ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे विशेषकरून दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. प्रशासकीय यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतल्याने होत असलेल्या दुर्लक्षाचा ठेकेदार फायदा उठवताना दिसत आहे.
या राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर ते चिपळूण दरम्यानचे काम सध्या लक्षवेधी ठरले आहे. मोडकाघर पुलाचे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन देणाऱया मनिषा कन्स्ट्रक्शनला काम पूर्ण करता आले नाही. पुलाच्या कामाबरोबर रस्त्यावरील खड्डे भरण्यावरून आक्रमक होणाऱया शिवसेनेची तलवार म्यान झाली आहे. तसेच भाजपने आपली भूमिका केवळ पत्रव्यवहार करण्यापुरती सिमित ठेवली आहे. मनसेही थंडावल्याने या समस्येला सध्या कोणीच वाली उरलेला नाही.
यामुळे मार्गताम्हाने ते गुहागरपर्यंतचा प्रवास जीवघेणा ठरला आहे. लॉकडाऊनमुळे मनिषा कन्स्ट्रक्शनला हे काम पूर्ण करता आले नाही. भाजपाने मोडकाघर पुलाचे काम पूर्ण हाईल म्हणून शृंगारतळी ते गुहागरपर्यंतचे खड्डे ठेकेदाराने भरावेत यासाठी आंदोलनाची नोटीस दिली. परंतु पुलाचेच काम अर्धवट राहिल्यानंतर खड्डे भरण्याचा विषयच संपला. यानंतर भाजपने याकडे पाठ फिरवली.
मार्गताम्हाने ते चिखलीपर्यंत अनेक ठिकाणी लहान मोऱयांची कामे अपूर्ण आहेत. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या इतर मार्गावरील जोडरस्ते तसेच ठेवले आहेत. लहान पुलाची कामे अर्धवट असल्याने ठिकठिकाणी माती साचली आहे. यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अपघात होत आहे. चिखली ते शृंगारतळीपर्यंतचा रस्ता आज मोठय़ा प्रमाणात वापरला जात आहे. परंतु या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. आज शृंगारतळीमार्गे चिपळूणला जायचे झाल्यास 20 कि. मी.चा जादा प्रवास करावा लागत आहे. मात्र नागरिक निमूटपणे सहन करत असल्याने नागरिकांच्या समस्येला कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे….









