प्रतिनिधी/ सातारा
चारच दिवसांपूर्वी मदन भोसले यांनी सव्वा तीनशे कोटी रुपयांच्यावर कर्ज असेल तर जाहीर करा, असे आव्हान केले होते. परंतु प्रत्यक्षात किसन वीर कारखान्यावर दायित्व कर्ज तब्बल 1 हजार 17 कोटी 34 लाख रुपयांचे आहे. हे मला सरकारी ऑडिटच्या अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे मदन भोसले हे खोटं रेटून बोलतात. 2003 ला तात्यांच्या हातून सत्ता त्यांच्या ताब्यात गेली. त्यांचा 2003-04 चा ताळेबंद पाहिला तर कारखान्याची परिस्थिती चांगली होती. हे मदन भोसले हे अध्यक्ष असतानाच अनेक वर्षांचा तोटा वाढून कोटय़ावधी रुपयांची कर्जे कारखान्यावर झाली आहेत. मदन भोसले यांनी काय करावे हे मी सांगू शकत नाही. त्यांनी हिमालयात जावं की राजकीय संन्यास घ्यावा, असा उपरोधिक टोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी मदन भोसले यांना लगावला. दरम्यान, गतवर्षी कारखाना चालू राहण्यासाठी आघाडी सरकारने थकहमी कर्ज म्हणून 30 कोटी 58 लाख दिले होते. त्यातील केवळ 8 कोटी रुपये भरले आहेत. त्यामुळे यावर्षी हंगाम सुरु होईल की नाही हे सांगता येत नाही. 14 लाख टन उसाचे क्षेत्र या कारखान्याच्या अखत्यारित येत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
साताऱयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे वाई तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, वाईचे उपसभापती विक्रांत डोंगरे, निवास शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन पाटील म्हणाले, किसन वीर कारखाना हा 2003 ला तात्यांच्या ताब्यातून मदन भोसले यांनी घेतला. त्यावेळी तात्यांनी डबघाईला आणला असा आरोप भोसलेंनी केला होता. मात्र, 2003-04 चा अहवाल पाहिला तर 60 लाख 41 हजार साखर पोती शिल्लक होती. त्यावेळच्या बाजारमुल्याप्रमाणे 91 कोटी व इतर मिळून 99 कोटी 42 लाख भागभांडवल शिल्लक होतं. तर कर्ज 76 कोटी 74 लाख 68 हजार एवढे होते. त्यावेळी कारखाना डबघाईला आला असता तर आर्थिक परिस्थिती चांगली होती. नेटवर्क प्लसमध्ये साडेआठ टक्के होतं. कारखान्याचा विस्तार तात्यांनी 1996 ला केला होता. 2022 मेट्रीक टन गाळप असलेला कारखाना 4 हजार मेट्रीक टन गाळप क्षमतेचा बनवला. त्याकरता 32 कोटी रुपये तात्यांनी खर्च केले आज 22 वर्ष झाली त्यास. तात्यांनी ते कर्ज सगळे निल केले. त्याकाळी कोणतीही बँक कर्ज देत नव्हती. केवळ जिल्हा बँकेचे कर्ज होती. आता कित्येक बँकांची कर्ज कारखान्यावर आहेत. माझा मदन भोसले यांना प्रश्न आहे की त्यांनी इतर प्रकल्प कारखान्यात उभारले. शेतकऱयांच्या उसाला जादा दर दिला का? 22 मेगॉवॅटचा प्रकल्प 115 कोटी रुपयांना उभा केला. वास्तविक तो प्रकल्प 88 कोटी रुपयांमध्येच उभा करायला हवा होता. 16 मेगॉवॅट फक्त वीज निर्मिती केली गेली, असाही आरोप नितीन पाटील यांनी केला.
मदन भोसले यांनीच कारखाना बुडवला
तात्यांच्या काळात 30 हजार लिटर क्षमतेची डिस्टलरी प्लॅन्ट उभा केला. एका वर्षात त्याचे पैसे निल केले होते. आता चालतही नाही. 15 कोटी रुपयांचे अल्कोहोल तयार व्हायला पाहिजे, ते होत नाही. प्रकल्प नुसतेच उभे करायचे परंतु ते पूर्ण क्षमतेने चालवायचे नाहीत. चुकीच्या कामकाजाच्या पद्धतीने मदन भोसले यांनीच कारखाना बुडवला आहे. पेशंटची धाकधुकी होती त्याला गतवर्षी सरकारने केवळ थकहमी देवून श्वास वाढवण्याचे काम केले. परंतु ऑलरेडी पेशंट गेलेला आहे, कारखाना बुडला आहे, असेही नितीन पाटील यांनी स्पष्ट केले.
नेटवर्क मायनसमध्ये असल्याने कर्ज कोणी देत नाही
पाटील बंधूच्यामुळे कर्ज देत नाहीत असा जो आरोप करण्यात आला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. प्रतापगड आणि खंडाळा कारखाना चालवण्यास घेतल्यानंतर त्यांच्याही तोटय़ाची जबाबदारी ही त्याच कारखान्यावर येते. प्रतापगडचा 174 कोटींचा आणि खंडाळा कारखान्याचा 65 कोटींचा तोटा असा किसनवीरचा एकूण 239 कोटींचा तोटा बॅलन्सशीटमध्येच दाखवण्यात आलेला आहे. कारखान्याचे नेटवर्क मायनन्समध्ये गेले असल्याने आरबीआयच्या नियमानुसार कोणतीही बँक त्यांना कर्ज देवू शकत नाही, असे नितीन पाटील यांनी सांगितले.
किसनवीर कारखान्यावर रिकव्हरी मारतात
जरंडेश्वर कारखाना आणि अजिंक्यतारा कारखान्याचे गाळप पहा. त्या कारखान्यापेक्षा कमीच रिकव्हरी दाखवण्यात आलेली आहे. मदन भोसले हे लबाड आहेत. सगळे उलटेपालटे धंदे करुन रिकव्हरी मारली जाते. त्यामुळे शेतकऱयांना एफआरपी देता येत नाही. 14 लाख मेट्रीक टन गाळप होणाऱया किसनवीर कारखान्याने यावर्षी ऊस तोडीच्या टोळीला पैसेही दिलेले नाहीत. ऊस तोड होईल की नाही हेही सांगता येणार नाही. होणाऱया नुकसानीला मदन भोसले आणि किसनवीरचे संचालक मंडळ जबाबदार असणार आहे. या†िवरोधात नितीन पाटील म्हणून कित्येकवेळा आवाज उठवला आहे. सभेला आतमध्ये गेला तर मारामाऱया झाल्या. मला सहा टाके पडलेत. रक्त सांडलय माझं. कारखान्यांची ही परिस्थिती पाहून मागच्या निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सुधारण्याची संधी म्हणून पाच वर्ष दिली गेली. परंतु कारखान्याची परिस्थिती सुधारता आली नाही, असाही आरोप त्यांनी केला.









