रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात भविष्यात 45 हजार 291 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. या विभागाच्या 49 पूर्ण झालेल्या धरण प्रकल्पांमुळे जिह्यात सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. अजूनही 17 धरण प्रकल्प अपूर्ण असून त्यांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 2 हजार 500 कोटींच्या निधीची गरज असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी सांगितले.
आगामी सन 2031 पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील बांधकाम सुरू असलेले सर्व धरण प्रकल्प पूर्ण होतील, असे सांगण्यात आले. जिह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने जिह्यात मध्यम, लघु धरण प्रकल्प सुरू असून काही पूर्ण झाले आहेत. जिह्यात 49 धरण प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या धरण प्रकल्पांमुळे 15 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तर या प्रकल्पामधून पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाणी दिले जात आहे. परंतु गट शेती योजनेसाठी मात्र पाण्याचा अगदी नगण्य वापर होत आहे. तो वाढावा, यासाठी पाटबंधारे विभागाचा प्रयत्न असल्याचे अधीक्षक अभियंता सुर्वे यांनी सांगितले.
जिह्यात पाटबंधारे विभागाचे अजून 17 मध्यम धरण प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यांची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यातील 7 प्रकल्प दोन वर्षांमध्ये पूर्ण होतील, तर उर्वरित प्रकल्प 2031 पर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे सांगण्यात आले. सध्या 20 हजार हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तर भविष्यात 45 हजार 291 हेक्टर सिंचनाखाली आणण्याचे नियोजित आहे. अपूर्ण असलेले 17 धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 2 हजार 500 कोटीची निधीची गरज असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
- जिह्यात नवीन कोणताही धरण प्रकल्प नाही
शासनाकडून पाटबंधारे विभागासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद केली जाते आणि तो निधी खर्चही होतो. यावर्षी साधारण 260 कोटीची तरतूद आहे. जिह्यात नवीन कोणताही धरण प्रकल्प नाही. परंतु चिपळूण-सुतारवाडी येथील येथे एक जुना नियोजित प्रकल्प आहे. पुनर्वसनाबाबत काही प्रश्न आहेत, परंतु ते सकारात्मक आहेत. पुनर्वसन आणि भूसंपादनाचे जिह्यातील कामही खूप चांगले असल्याचे अधीक्षक अभियंता सुर्वे यांनी सांगितले.
- चिपळूण, राजापूरच्या पूररेषांचा अभ्यास, शास्त्रीय पद्धतीनेच निश्चिती
जिह्यातील चिपळूण व राजापूरच्या पूररेषा निश्चित करताना खूप अभ्यास करून शास्त्रीय पद्धतीने केली जाते. साधारण 100 वर्षांतील पुरांचा अभ्यास करून रेड आणि ब्ल्यु या दोन पूररेषा निश्चित केल्या जातात. त्यामुळे येथील फेरसर्वेक्षण करून जरी पूररेषा निश्चित केल्या गेल्यास त्यामध्ये फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे. कारण अभ्यासपूर्ण व शास्त्रीय पद्धतीनेच या पूररेषा पाटबंधारे विभागामार्फत निश्चित केल्या असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी सांगितले.
..








