बारावी निकाल मूल्यांकन 30ः30ः40 सूत्रानुसार : सर्वोच्च न्यायालयात गुणांकनाचे सूत्र सादर
परीक्षण…
- सीबीएसई, सीआयएससीई मूल्यांकन योजनांना मान्यता
- निकालावर आक्षेप असलेल्यांना परीक्षेला बसण्याची संधी
- सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी पुढील सुनावणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा नुकत्याच रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएससी बोर्डाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला आहे. सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेची गुणपत्रिका तयार करण्यासाठी बनवलेल्या 13 सदस्यीय समि?तीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला. त्यानुसार अंतिम निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावी गुण ग्राह्य धरले जाणार असून 30ः30ः40 असे सूत्र ठरविण्यात आले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना निकालावर आक्षेप असेल त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल, असे ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
कोरोना संसर्गामुळे सीबीएसई बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. निकाल बनवण्यासाठी 13 सदस्यीय समिती बनवण्यात आली होती. या समितीने निकालाचा फॉर्म्युला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. तसेच दहावीचा निकाल 20 जुलैपूर्वी तर बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर केला जाईल, असे सरकारने सुनावणीवेळी सांगितले.
सीबीएसई बोर्डाकडून सादर करण्यात आलेल्या निकषानुसार, बारावीचा निकाल तयार करताना दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयातील सर्वाधिक गुण विचारात घेतले जातील. तर अशाच प्रकारे अकरावीच्या पाच विषयांची सरासरी घेतली जाईल. तसेच बारावीच्या परीक्षेतील युनिट, टर्म आणि प्रॅक्टिकलचे गुण अंतिम निकाल बनवण्यासाठी घेतले जातील. दहावीचे 30 टक्के, अकरावी 30 टक्के आणि बारावीच्या 40 टक्के गुणांच्या आधारावर अंतिम निकाल बनवला जाईल.
20 जुलैपूर्वी दहावीचा, 31 जुलैपर्यंत बारावी निकाल
दहावी परीक्षेचा निकाल 20 जुलैपूर्वी जाहीर करणार असल्याची घोषणा सीबीएसई बोर्डाने केली आहे. तर बारावीच्या परीक्षेचा निकाल 31 जुलैपूर्वी लावला जाणार आहे. फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर तातडीने निकाल तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विदेशात जायचे असल्यास किंवा पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी बारावीचे मूल्यमापन लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा रद्दच्या निर्णयावर आता पुनर्विचार नाही!
12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारने 1 जून रोजी देशभरातील 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. तसेच सीआयएससीई आणि सीबीएसईच्या मूल्यांकन योजनेबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच दोन्ही मंडळांनी 31 जुलै रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर करावेत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या विशेष सुट्टीकालीन खंडपीठासमोर याविषयीची सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी येत्या सोमवारी हेणार आहे.
बारावी गुणांकनाचे सूत्र :
वर्ग टक्केवारी मूल्यांकन निकष
- 10 वी 30 टक्के सर्वाधिक गुणांपैकी तीन विषयांतील सरासरी
- 11 वी 30 टक्के थेअरी परीक्षेच्या आधारे मिळालेले एकूण गुण
- 12 वी 40 टक्के युनिट टेस्ट/ मीड टर्म / पूर्व परीक्षेतील गुण









