प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊन नंतर सर्वसामान्य माणसाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये अनेकांचे व्यवसाय, रोजगार ठप्प झालेत. यातून पोटाचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला. यात रत्नागिरी तालुक्यातील सांडेलावगणच्या ‘जग पुस्तकांचे ग्रंथालय व फिरत्या वाचनालय’ च्या शाखेच्या धनजंय पाष्टे व राहुल बेनेरे या दोघा विद्यार्थ्यांनी घराजवळच्या 6 गुंठे जागेत ‘सेंद्रीय भाजी’ लागवडीचा उपक्रम हाती घेतला आणि तो आता बहरासही आला आहे.
हा उपक्रम राबवणारे हे दोघेही युवक रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेटय़े महाविद्यालय रत्नागिरी येथे राहुल बेनेरे हा द्वितीय वर्ष कला शाखेत तर धनंजय पाष्टे हा तृतीय वर्ष कला शाखेत शिकत आहे. हे जग पुस्तकांचे वाचनालयाचे वाचक असून सक्रिय कार्यकर्ते देखील आहेत. लॉकडाऊन काळात काय करायचे? आपल्या पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा हा दोघांसमोरही प्रश्न होता. यावरून त्यांनी ग्रंथालय संचालक प्रसाद पाष्टे यांच्याशी चर्चा केली. त्यातून हा उपक्रम हाती घेण्याचा निर्धार केला.
आपल्याकडील उपलब्ध साधने त्यामध्ये पाणी आणि जागा या दोन्ही गोष्टींची सांगड घालून भाजी लागवड करणे हा उपक्रम करायचे निश्चित करण्यात आले. यामध्ये जी जागा होती ती धनंजय पाष्टे यांच्या पडक्या घराची जागा वापरात नव्हती. तसेच नवीन घराजवळ सुद्धा थोडय़ा प्रमाणात जागा शिल्लक होती. त्यात विविध प्रकारचे सामान या भागात ठेवलेले होते, त्याची साफसफाई करण्यात आली. त्यातच हे काम करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी धनंजय चे वडील नथुराम पाष्टे यांनी आपली जागा देऊन सहकार्य केले.
भाजी लागवड करायची झाली तर त्याची लागवड कशी, कधी करायची याचा काहीच अनुभव गाठीशी नव्हता. यात सहकार्य लाभले ते वाटद खंडाळा येथील भाजी व्यावसायिक राकेश वरवटकर व हातखंबा झरेवाडी येथील कृषी विद्यार्थी प्रतीक कळंबटे याचे यांनी वेळोवेळो फोनवर व व्हिडीओ कॉल द्वारे संपूर्ण माहिती आणि काही प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले, त्यातून एक एक बाजू समजून घेत हा प्रकल्प उभा केलेला आहे. यातून सेंद्रीय लागवड करणे निश्चित झाले. त्यासाठी लागणारी बियाणे, त्यानंतर सेंद्रिय खते, फवारणीची साधने असा काही प्रमाणात खर्च होता.
ही लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला करायचे, असे ठरले त्यामुळे त्याअगोदरचा पंधरा दिवसांचा कालावधी इकडे तिकडे रोजगाराची कामे करून या दोघांनी एकत्रित केला. आणि याच खर्चातून समोरचा प्रश्न मिटवला. यामध्ये दोन्ही ठिकणी 6 ते 7 गुंठय़ांत पडवळ, कारले, भोपळा, भेंडी, दोडके, गवार ही पिके घेतली आहेत. हि भाजीपिके आता चांगली बहरास आली आहेत. त्याची फळनिर्मिती प्रक्रिया सुद्धा सुरू झाली. परिसरातील गावांमध्ये ही सेंद्रिय भाजी विकून लोकांना आरोग्यासाठी योग्य प्रकारची भाजी देण्याचा प्रयास धनंजय व राहुल या तरूणांनी अंगिकारला आहे.
यासाठी पंचायत समिती सदस्या साक्षी रावणंग, सामाजिक कार्यकर्ते संतोष रावणंग यांचे मार्गदर्शन लाभले. सांडेलावगण गावचे ग्रामस्थ जयवंत बेनेरे, परशुराम पाष्टे, सुरेश पाष्टे, वसंत पाष्टे आणि वाचनालयाचे कार्यकर्ते विनायक गावडे, आकाश सावरकर, तुषार मांडवकर, प्रणाली बैकर, सोनाली कुरतडकर, साक्षी कुरतडकर, अनिकेत बेनेरे, राजेश पाष्टे, मिथुन पाष्टे, सुयश बेनेरे, रोशन बेनेरे यांचे सहकार्य लाभले.









