विश्वजीत कृ. राणे कार्यकर्त्यांसह मंगळवारी करणार ‘आप’मध्ये प्रवेश
प्रतिनिधी /वाळपई
भाजपचे ज्येष्ट नेते विश्वजीत कृष्णराव राणे, मोठय़ा संख्येने आपल्या समर्थकांसह मंगळवारी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये सामील होणार आहेत. विश्वजीत राणे यांनी दशकभर भाजपसाठी काम केले आणि ते सक्रिय ज्येष्ट नेत्यांपैकी एक होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात पर्येमधून निवडणूक लढवली होती.
आम्ही काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्षांना राज्यात सत्ता गाजवताना पाहिले आहेत मात्र सत्तरी भागात खरा बदल ते घडवून आणू शकलेले नाहीत. त्यांना फक्त स्वतःच्या विकासाची काळजी आहे, बाकी कशाचीही काळजी नाही असे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राणे म्हणाले. जनतेचा भाजप आणि काँग्रेस या दोघांवरील विश्वास उडाला आहे आणि त्यांना नेतृत्वासाठी फक्त आप हाच योग्य पक्ष वाटतो. त्यावेळी भाजपमध्ये येण्याची माझी प्रेरणा मनोहर पर्रीकर यांची होती. सध्याच्या सरकारने तो विश्वास गमावला आहे. वर्तमान स्थितीत अरविंद केजरीवाल यांचीच दृष्टी गोव्याचा कायापालट करू शकते. त्यामुळे आपण ‘आप’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
आपने केवळ दिल्लीतच नाही तर गोव्यातही केलेल्या कामामुळे मी प्रभावित झालो आहे. आम्ही दुसऱया कोविड लाटेशी झुंज देत होतो, तेव्हा आमची मदत करण्यासाठी फक्त आप होते हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यांनी रेशन, ऑक्सजिन कॉन्सन्टेटर आणि बऱयाच गोष्टी जनतेला उपलब्ध करून दिल्या.
मूलभूत गरजा पुरविण्यास आमदार सक्षम नाही
मी मातीचा सुपुत्र आहे आणि माझ्या मतदारसंघातील बांधवांना वर्षानुवर्षे आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलेले आहे याचे मला दुःख वाटते. आपण सर्वांनी एका कुटुंबावर विश्वास दाखवला पण आपल्याला काय मिळाले? ऑनलाइन क्लासेसमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी नेटवर्कसाठी इकडे तिकडे धावत असल्याचे मी पहिले. माझ्या माता-भगिनींना प्राथमिक औषधोपचारासाठी धडपडताना मी पाहतोय, अशी खंत राणे यांनी व्यक्त केली सत्तरीतील अनेकांनी 24 तास पाणी पुरवठय़ाच्या आशेने धरणासाठी आपली जमीन दिली. दुर्दैवाने, सत्तरीवासियांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ते टँकरच्या वितरणावर अवलंबून आहेत. मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यास आमदार सक्षम नाहीत, अशी टीका त्यांनी केली
आपची सत्ता आल्यास तरुणांसाठी काम करणार
बेरोजगारीचा दर हा देखील मतदारसंघातील एक मोठा मुद्दा आहे. अनेक पदवीधर ज्यांच्याकडे बीए.सी, एम.कॉम, एम.ए अशा पदवी आहेत ते मल्टीटास्किंग नोकऱया, सुरक्षा रक्षकासाठी अर्ज करत आहेत. दररोज 100-150 तरुण मदत मागण्यासाठी माझ्या कार्यालयात येतात. सत्तरीत बहुराष्ट्रीय कंपन्या स्थापन केल्यास तरुणांना फायदा होईल. ‘आप’ची सत्ता आल्यावर आम्ही तरुण गोवेकरांच्या भल्यासाठी काम करू, असेही ते म्हणाले.









