भाजप सरचिटणीस अशोक सावंत यांची मागणी
प्रतिनिधी / मालवण:
सिंधुदुर्ग जिल्हा लॉकडाऊन असतानाही शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे मुंबईतून सहा गाडय़ांचा ताफा घेऊन जिल्हय़ात दाखल झाले आहेत. या सर्व गाडय़ा 18 एप्रिलच्या रात्री खासदारांचे निवासस्थान असलेल्या तळगावात दाखल होऊन त्यानंतर वेगवेगळय़ा ठिकाणी मार्गस्थ झाल्या. मुंबईतून आल्यानंतर किमान पाच दिवस होम क्वारंटाईन राहण्याचे शासनाचे निर्देश असताना त्याचा भंग करून खासदार राऊत यांचा दुसऱया दिवसापासून जिल्हय़ात दौरा सुरू आहे. त्यामुळे खासदार राऊत यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करा. तसेच खासदारांसमवेत मुंबईतून आलेल्या अन्य वाहनांचा देखील शोध घ्या, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधींनी मुंबईतून जिल्हय़ात गेल्यानंतर पाच दिवस होम क्वारंटाईन राहिल्यानंतरच जिल्हय़ातील बैठकांमध्ये सहभागी होण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र खासदार राऊत हे 18 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तळगाव येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर होम क्वारंटाईनचे नियम मोडून 19 रोजी सकाळ पासूनच जिल्हय़ातील वेगवेगळ्य़ा तालुक्यात बैठका घेत फिरत आहेत. 19 रोजी सकाळी त्यांनी मालवण नगर पालिकेत शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली. तसेच त्यानंतर वेगवेगळय़ा ठिकाणी बैठका, पत्रकार परिषदा घेतल्या. शिवाय त्यांच्यासोबत मुंबईतून गावात येताना मुंबई पासिंगच्या सहा गाडय़ा होत्या. या गाडय़ा त्यांना गावात सोडून अन्यत्र रवाना झाल्या. त्या गाडय़ा कोणाच्या होत्या? त्या गाडय़ांतून येणाऱयांनी परवानगी घेतली होती का? त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले आहे का? याची तपासणी करावी, अशी मागणी अशोक सावंत यांनी केली आहे.
आमदार नीतेश राणेंनी स्वतःला करून घेतलंय होम क्वारंटाईन
आमदार नीतेश राणे सोमवारी मुंबईतून सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. मात्र शासकीय निर्देशानुसार जनतेच्या हितासाठी त्यांनी पाच दिवसांसाठी स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. त्यानंतर ते जिल्हय़ात आणि मतदारसंघात भेटीगाठी घेऊन आढावा घेणार आहेत. पण 18 रोजी जिल्हय़ात आलेल्या राऊत यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वत:ला होम क्वारंटाईन करून न घेता वेगवेगळय़ा ठिकाणी बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे खासदारांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱयांना होम क्वारंटाईन करावे. हा जिल्हा आजपर्यंत कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासकीय अधिकारी आणि जनतेने यश मिळवले आहे. पण मुंबईसारख्या कोरोनाच्या हॉटस्पॉटवरून जिल्हय़ात आलेल्या खासदारांच्या बेफिकीरपणामुळे जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची शासन आणि प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.









