जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवशेद्वारासमोर केले आंदोलन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्र सरकारने कृषी विधेयक काढून देशातील शेतकऱयांवर अन्याय केला आहे. हे विधेयक तत्काळ रद्द करावे, यासाठी रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुख्य रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवण्यात येऊन भाजपा सरकारच्या कारभारावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी दिल्ली हाथरस येथील दलित मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी गेलेले खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचाही जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुख्य रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करूनही हे आंदोलन यशस्वी केले.
कॉंग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले, माजी विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे, नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी उपमहापौर तथा नवरसेवक अविनाश लाड, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या रुपालीताई सावंत, जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अश्विनी आगाशे, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, खेडचे तालुकाध्यक्ष गौस खतीब, जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती-जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, कपिल नागवेकर, दीपक राऊत, अल्पेश राऊत, लियाकत शहा आदी उपस्थित होते.









