प्रतिनिधी / रत्नागिरी
कोकणच्या विकासासाठी अपरिहार्य असलेले रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय नागरी विमानन मंत्रीहरदीप पुरी यांना पत्र पाठवून पाठपुरावा केला आहे.
नैसर्गिक सौंदर्य व साधनसामुग्रीचे वरदान असलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यांमध्ये पर्यटन, फलोत्पादन व अन्नप्रक्रिया अशा अनेक क्षेत्रांची भरभराट करण्याची अफाट क्षमता आहे. रस्ते व रेल्वेमार्गानंतर विमानतळाची उपलब्धता या दोन्ही जिह्यांच्या शाश्वत, समतोल व समन्यायी अर्थसामाजिक विकासाला मोठी चालना देऊ शकेल.
उडान योजनेअंतर्गत 5 मार्च 2019 रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. रत्नागिरी-मुंबई-रत्नागिरी विमान वाहतुकीसाठी उडान 3.1 योजनेअंतर्गत बोलीही मागवल्या गेलेल्या आहेत. सिंधुदुर्ग विमानतळासोबतच रत्नागिरी विमानतळाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती प्रभू यांनी केंद्रीय नागरी विमान मंत्री यांना केली आहे. या विनंतीची तत्परतेने दखल घेऊन रत्नागिरी विमानतळ प्रकल्पाला आवश्यक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









