तृणमूल कॉँग्रेसच्या मुखपत्रात दावा – राहुल ठरले अपयशी , मोदींना आव्हान देण्यास ममता यशस्वी
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसे पाहिल्यास काँग्रेससोबत मिळून विरोधी पक्षांच्या एकजुटतेचे आवाहन करतात. पण त्यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने राष्ट्रीय नेतृत्वाच्या दाव्याबद्दल तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय काँग्रेस नेते राहुल गांधी नसून ममता बॅनर्जी असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे.
मोदींसमोर विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून ममता बॅनर्जीच उभ्या ठाकल्या असल्याचे तृणमूलकडून म्हटले गेले. तर काँग्रेसने यावर प्रत्युत्तर देत राहुल गांधी 2014 पासूनच मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांचे सर्वात उपयुक्त नेते म्हणून ओळख टिकवून असल्याचे सांगितले आहे.
काँग्रेस नेते अपयशी- तृणमूल
तृणमूलचे वृत्तपत्र जागो बांग्लाने एक लेख प्रकाशित केला आहे. या लेखाचा मथळा ‘राहुल गांधी अपयशी, ममता आहेत पर्याय’ अशा अर्थाचा आहे. या लेखात तृणमूलचे लोकसभा खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. देश पर्यायाचा शोध घेत आहे. मी राहुल गांधींना दीर्घकाळापासून ओळखतो, पण ते मोदींना पर्याय म्हणून ओळख प्राप्त करण्यास अपयशी ठरल्याचे मी म्हणू शकतो. तर ममता बॅनर्जी याप्रकरणी यशस्वी ठरल्याचे बंडोपाध्याय यांनी लेखात नमूद केले आहे.
पर्यायावर बोलणे घाईचे ठरणार
तृणमूल काँग्रेसच्या या दाव्यावर आता वाद सुरू झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगाल काँग्रेसने अशा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, मोदींना पर्याय कोण ठरणार हे सांगणे आता घाईचे ठरणार अशी भूमिका मांडली आहे. कोण यशस्वी आणि कोण नाही या चर्चेत आम्ही पडू इच्छित नाही. सध्या 2021 हे वर्ष सुरू असून लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार असल्याचे पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले.
सर्वसंमतीने नेत्याची निवड व्हावी
आपला नेता कोण होणारे हे विरोधी पक्षांनी सर्वांच्या सहमतीने निश्चित करावे. आघाडीत सहकारी पक्षांनी नेहमीच सर्वसंमतीने नेता निवडल्याचे भारतीय राजकारणात इतिहासात दिसून येईल. याचमुळे या मुद्दय़ावर अनेक मतप्रवाह असू शकतील, पण यातील कुठल्याच विचाराला अंतिम निर्णय म्हणता येणार नसल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.
तृणमूलचे स्पष्टीकरण
तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुणाल घोष यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल आहे. आमच्या पक्षाचा उद्देश काँग्रेसचा अपमान करणे नाही तसेच काँग्रेसला वगळून राष्ट्रीय स्तरावर भाजपला पर्याय देण्याचा प्रयत्नही आम्ही करत नाही आहोत. सुदीप बंडोपाध्याय यांनी काँग्रेसला वगळून कुठल्याच पर्यायाचा मुद्दा मांडलेला नाही. जनताच राहुल यांना मोदींसाठी पर्याय मानत नाही तसेच राहुल सध्या यासाठी तयार देखील नसल्याचा स्वतःचा अनुभव बंडोपाध्याय यांनी मांडला असल्याचा दावा घोष यांनी केला आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी स्वतःला सिद्ध करू शकले नाहीत. पण 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर ममता बॅनर्जी या मोदींना पर्याय म्हणून समोर आल्याचे विधान घोष यांनी केले आहे.









