त्या दिवशी भेटायला आलेल्या प्रमिलाताईंची स्थिती फारच विचित्र झाली होती. ‘मॅडम..अं..मी..मी आत येऊ का?’ ‘हो. या.. बसा ना.’ त्यांच्याकडे पाहता क्षणी त्या खूप अस्वस्थ आहेत हे लक्षात येत होते. त्या बसल्या आणि माझा हात त्यांनी घट्ट पकडला, ‘मॅडम आ..ज..आ..ज सगळं मनातलं बोलायचं आहे तुमच्याजवळ. जे जे आहे ते कबूल करायचंय. मला.. मला प्लीज समजून घ्याल ना? प्लीज.’ असे म्हणत रडू लागल्या. पाच मिनिटे तशीच निघून गेली. ‘हो. शांत व्हा. अगदी मोकळेपणाने बोलू शकता तुम्ही. त्यासाठी आधी रडणं थांबवायला हवं ना?’ ‘अं.. हो हो..’ असे म्हणत कसेबसे उसने अवसान आणून त्यांनी रडू आवरले. ‘हं .आता मला सांगा काय झालं आहे?’
‘मॅडम, मी त्याकाळची डबल ग्रॅज्युएट! पण नुसतीच सुशिक्षित हो. सुसंस्कृत नाही. तशी असते ना तर अशी चूक केलीच नसती. खूप खूप चुकले मी. कधी माझा अहंकार तर कधी ईर्षा आड येत गेली. साधं कौतुक करता आलं नाही तिच्यासमोर तिचं. पोरीनं खूप केलं आमच्यासाठी. पण मी..मी कपाळकरंटी. करायलाच हवे. तिचाच तर संसार आहे असे म्हणत राहिले. पण आता संसार करायला राहिलीच कुठे ती? कशी सावरू हो मी. माझी सून अश्विनी कायमची या जगातून निघून गेली. अतिशय हुशार आणि कर्तृत्ववान! लेखन, वक्तृत्व, शिकविण्याची कला, उत्तम संभाषण कौशल्य, जिद्द, अनेक गुण होते. दहा वर्षांपूर्वी लग्न होऊन ती आमच्या घरी आली. एक कमालीचं वेगळेपण होतं तिच्यामधे. तसं पाहिलं तर माहेरीही खूप संपन्नतेमधे वाढलेली मुलगी परंतु कसलाही गर्व नव्हता. संसारचक्र सुरू झालं आणि तीही त्यात अडकत गेली. आम्ही जिथे राहतो तो तसा गावभागच असल्याने तिच्या शिक्षणाला तसा काहीच स्कोप नव्हता. तिच्या पद्धतीनं तिचं काम सुरू होतं. कुणाला लागेल ती मदत करणे हे सुरूच असायचे. लोक तिचं कौतुक करायचे. तिच्या शब्दाला विशेष किंमत होती. कौतुकाने बोलायचे तिच्याविषयी. काय माहिती.. कदाचित नकळत आतल्या आत कुठेतरी मला कमीपणा वाटायचा. मनातल्या मनात तुलना व्हायची. तसं पाहिलं तर कधी भांडण नाही आमच्यात. माझा ‘इगो’ सांभाळत सर्व करायची. वाढदिवस आवडीने साजरे करायची. कुठे जायचं झालं तरी तिने कामे कधी मागे ठेवली नाहीत. उरकही दांडगा होता. भराभर सगळं आवरायची. माझ्या काही मैत्रिणी म्हणायच्याही.. प्रमे, भाग्यवान आहेस तू. अशी सून लाभायला भाग्य हवं. पुन्हा मला आतल्या आत राग यायचा. वाटायचं, त्यात काय, इतकी वर्षे आपणही केलंच की.. करायलाच हवं ना. तिचाच तर संसार आहे. खरं म्हणाल तर एकेकदा मलाही आतून वाटायचं खरंच आपण भाग्यवान आहोत.
दहा वर्षे बारीक सारिक कामांव्यतिरिक्त कसलीच जबाबदारी नव्हती माझ्यावर. पण कौतुक नाहीच केलं हो कधी. माझ्या मुलाचा स्वभावही काहीसा माझ्यासारखाच. त्यानेही फार कधी कौतुक केलं नाही की कधी वर्षाकाठी मनसोक्त हिंडायलाही नेलं नाही. काम आणि काम. हल्ली ती म्हणायचीही. मलाही कंटाळा आलाय तेच तेच करून. कधीतरी बदल नको का? कसली गं हल्लीची मुलं तुम्ही. कसले कंटाळे येतात तुम्हाला? घरात सगळय़ा सोयी आहेत. मग कंटाळायला काय झालं? ही त्यावर माझी टिप्पणी असायची. खरंतर आताच्या पिढीतली मुलं कित्ती एन्जॉय करतात, हिंडतात, फिरतात हे पाहतो आम्ही. मी स्वतःहून म्हणायला हवं होतं. जा कधीतरी फिरायला. पण नाही. माझा अहं आड यायचा. मला वाटायचं, संसार म्हटल्यावर हे सारं आलंच. आम्ही नाही कुरकुरलो कधी. मी दुर्लक्ष करायचे.
त्या दिवशी ती नेहमीसारखं झाडांना पाणी घालत होती. तसं काहीच होत नव्हतं तिला. अगदी व्यवस्थित होती. अचानक तिथेच कोसळली. उपचारांना संधी मिळालीच नाही. तिथेच सर्व संपलं होतं. निघून गेली कायमची. खरीखुरी लांबच्या प्रवासाला.. एकटीच.’ असे म्हणत त्या पुन्हा रडू लागल्या. ‘मॅडम, आज ती गेल्यावर कळतंय काय गमावलंय मी! माझा मी पणा, तोरा साफ उतरला. मी मोठी संसार केलेली आहे की जिवंत!! तरी घर पोरकं झालं.. मी पोरकी झाले. आता सारं आठवतंय. किती क्षुल्लक, साध्या साध्या गोष्टी असतात हो. खरेखुरे कौतुकाचे शब्द, केलेल्या चांगल्या कामाला भरभरून दाद, किंवा तुझं हे आवडतं हं मला..हे व्यक्त करायला जीभ का जडावली माझी? ती आल्यापासून मी खऱया अर्थी निवांत झाले. पण त्याबद्दल कधी साधी कृतज्ञताही व्यक्त केली नाही. तिचाच तर संसार आहे. करायलाच हवं हेच म्हणत राहिले.’ प्रमिलाताई सलग घडाघडा बोलत होत्या. मनातली खदखद, खंत, कमालीचा झालेला पश्चात्ताप बाहेर येत होता.
प्रमिलाताईंसारखी अनेक माणसे भेटत असतात. ज्यांच्या हातून अगदी वाळूसारखी अलगद वेळ, माणसं निसटून जातात आणि व्यक्त न झाल्याची खंत सावलीसारखी पाठराखण करते. खरंतर बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, खळखळून हसण्याचे वरदान माणसालाच लाभले आहे. कौतुक करणे, कृतज्ञता व्यक्त करणे हे आपण करू शकतो. परंतु असे असूनही कितीजण दुसऱयाच्या चांगल्या गोष्टीचे कौतुक करतात? एखाद्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात? आपली एखादी मैत्रीण तिच्याकडे खूप चांगली कौशल्ये आहेत, बहीण भाऊ, सासू सून, पती पत्नी अशी अनेक नाती ज्यामधे त्या व्यक्तींमधे असलेल्या चांगल्या गोष्टींचे मोकळेपणाने कौतुक किती जण करतात? प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. क्वचित ‘संकोच’ यामधे अडथळा असतो परंतु बऱयाचदा ‘अहं’ तर अनेकदा ‘ईर्षा’ हा कौतुक करण्यामधला अडथळा असतो. खरेखुरे कौतुकाचे दोन शब्द नात्याची वीण घट्ट करतात. प्रोत्साहन देतात.
ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याजवळ असते त्यावेळी माणसाला त्याचे मोल वाटत नाही. कधी कधी अगदी सुरळीत सारे चाललेले असते म्हणूनच की काय, असे आयुष्य वा माणसं आपल्याला लाभणे ही किती मोलाची गोष्ट आहे हेच आपण विसरतो. आपली अशी माणसं असणे, कुणीतरी आपल्यासाठी करणे यातले सुख आपण इतके गृहीत धरून चालतो की प्रमिलाताईंसारखे त्या व्यक्तीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटायला हवे, ते व्यक्तही करायला हवे हेच विसरतो. एखाद्या दिवशी अचानक ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते आणि नंतर तिचे असणे किती मोलाचे होते हे उमगते. म्हणून आपल्या भोवतालच्या गोष्टी, व्यक्ती, क्षण आयुष्यात जे जे चांगले लाभले आहे ते त्याकडे जाणीवपूर्वक कृतज्ञतेने पहायला हवे. दुसऱयाच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करायला हवे. कौतुक करता येत नाही, व्यक्त होता येत नाही ही सबब सांगण्यापेक्षा ते कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. कारण आपण कुणीच अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलो नाही.. कुठल्याही क्षणी ‘आहे’ चे ‘नाही’ होऊ शकते याचे भान ठेवायला हवे. एखाद्या व्यक्तीच्या आवडलेल्या गोष्टीचे मनापासून केलेले कौतुक त्याला प्रोत्साहन देतेच परंतु आपल्यालाही आनंदी करते. आजमावायचे असेल तर करून पहा.. आजवर कुणाकुणाला धन्यवाद द्यायचे राहिले आहेत, कुणाची एखादी गोष्ट आवडली, कौतुक करावेसे वाटले परंतु केले नाही.. अशा व्यक्तींची यादी आपण करू शकतो आणि मोकळेपणाने कृतज्ञता व्यक्त करू शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे. मग करणार ना प्रयत्न?
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583








