काँग्रेस नेत्या रॉयला फर्नांडिस यांचा सवाल : चांदर येथील घटनेवर व्यक्त न होणे दुर्दैवी
प्रतिनिधी/मडगाव
गोव्यात महिलांवर अत्याचार वाढत आहेत. परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यावर का बोलत नाहीत, असा प्रश्न काँग्रेस नेत्या व पक्षाच्या बाणावली जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या उमेदवार रॉयला फर्नांडिस यांनी विचारला आहे. चांदर येथे एका तरुणीवर दिवसाढवळय़ा झालेल्या हल्ल्यावर डॉ. सावंत यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया का आली नाही याबद्दल त्यांनी जाब विचारला आहे.
आपण गोव्याचे मुख्यमंत्री आहात व राज्यातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करणे हे आपल्या सरकारचे कर्तव्य आहे. गिरदोली-चांदर येथे एका तरुण मुलीला दिवसा रस्त्यात अडवून तिला जबरदस्तीने जंतुनाशक पाजले जाते. त्यावर मुख्यमंत्री साधे ट्विट वा भाष्य करत नाहीत तसेच चौकशीचे आदेशही देत नाहीत हे अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांवरील अत्याचारांबद्दलची सरकारची अनास्था यावरून दिसते, असे फर्नांडिस यांनी म्हटले आहे.
पर्वरी येथे एका व्यक्तीला वाटेत अडवून जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट केले होते. त्या ट्विटला उत्तर देताना फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांना महिलांवरील अत्याचारांबद्दल जाब विचारला आहे. पर्वरीतील घटनेत मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करताना फर्नांडिस यांनी सर्वांना योग्य संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.
मुख्यमंत्र्यांची वृत्ती धक्कादायक
चांदर येथील घटनेनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी कोणतेच ट्विट वा भाष्य केले नाही. मुख्यमंत्र्यांची ही वृत्ती धक्कादायक आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे आज गृह खात्याचा ताबा आहे. गोव्यातील जनतेला योग्य सुरक्षा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे पर्वरीतील घटनेवर भाष्य करणारे मुख्यमंत्री चांदरच्या घटनेवर गप्प राहतात यावरून गोवा सरकार महिलांचे शोषण करण्याचे भाजपचे धोरण राबवत आहे का असा प्रश्न निर्माण होतो, असे फर्नांडिस यांनी म्हटले आहे.
गिरदोली-चांदर येथील तरुणीवरील हल्ल्याचा तपास जलदगती यंत्रणेमार्फत केला जावा व हल्लेखोरांना पोलिसांनी ताबडतोब अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आज गोव्यात महिला घराबाहेर पडण्यास घाबरत असून त्यांना असुरक्षित वाटत आहे, असा दावा फर्नांडिस यांनी केला आहे.









