वृत्तसंस्था/ कौलालंपूर
20 व्या आशियाई पुरुष आणि महिलांच्या सांघिक स्क्वॅश स्पर्धेत टॉप सीडेड भारतीय पुरुष संघाने शुक्रवारी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीच्या लढतीत भारताने हाँगकाँगचा 2-0 असा पराभव केला. या स्पर्धेत महिला विभागात भारताचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. हाँगकाँगने भारताचा 2-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
पुरुषांच्या सांघिक उपांत्य लढतीच्या पहिल्या सामन्यात भारताच्या सौरभ घोषालने हाँगकाँगच्या फुंगचा 10-12, 11-6, 11-6, 15-13 अशा गेम्समध्ये 55 मिनिटांच्या कालावधीत पराभव केला. दुसऱया सामन्यात भारताच्या रमित टंडनने हाँगकाँगच्या हेन्री लियुंगचा 4-11, 11-5, 11-8, 11-5 असा पराभव करत आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले. टंडनने हा सामना 37 मिनिटात जिंकला. शनिवारी या स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात पुरुष विभागातील जेतेपदासाठी लढत होईल. मलेशियाने उपांत्य लढतीत जपानचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. महिलांच्या सांघिक उपांत्य लढतीत पहिल्या सामन्यात भारताच्या ज्योस्ना चिन्नाप्पाने हाँगकाँगच्या लींगवर 9-11, 11-5, 11-7, 11-5 अशी मात केली. दुसऱया सामन्यात हाँगकाँगच्या लॉकने भारताच्या सुनयना कुरुविलाचा 9-11, 11-7, 11-4, 11-8 असा पराभव करत आपल्या संघाला 1-1 बरोबरी साधून दिली. त्यानंतर तिसऱया सामन्यात हाँगकाँगच्या विंगने भारताच्या उर्वशी जोशीचे आव्हान 12-10, 11-4, 11-6 असे संपुष्टात आणले. या पराभवामुळे भारतीय महिला संघाला अंतिम फेरीपासून वंचित व्हावे लागले. या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने तिसऱयांदा अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी म्हणजे 1981 व 2012 साली भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.









