प्रतिनिधी/ पणजी
गोव्याला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यास यंदा 34 वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी दि. 30 मे 1987 रोजी गोव्याला घटकराज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आल्याने घटकराज्य दिनाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत.
राज्यात सध्या कर्फ्यू लागू असून दि. 31 मे रोजी संपणारी त्याची मुदत 7 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही सरकारी तसेच खासगी कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यास मनाई आहे. त्या पार्श्वभूमीवर आजचा घटकराज्य दिन कोणताही मोठा सोहळा आयोजित न करता ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
दरम्यान, आजच्या घटकराज्य दिनानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना उद्देशून दिलेल्या संदेशात सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी गोवा सज्ज आणि समर्थ असल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा मुकाबला करतानाच त्याचा प्रसार रोखण्यासाठी सर्व दक्षता, सुरक्षितता आणि काळजी घेतल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.
कोरोनाच्या या संकटानंतर आता गोव्यासमोर अन्य अनेक आव्हाने उभी राहणार आहेत. राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा रुळावर आणणे हे त्यातील प्रमुख आव्हान असेल. ती खरी काळाची गरज आहे आणि त्या परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडण्याबरोबरच भविष्यातीलही प्रत्येक आव्हान यशस्वीरित्या पेलण्यासाठी सरकार हरतऱहेचे प्रयत्न करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
गत काही दशकात गोव्याने खास करून शिक्षण, आरोग्य, विकास, साधनसुविधा यासारख्या अनेक क्षेत्रात भरीव विकास साधला आहे. अनेक विकासप्रकल्प आणि कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यावरून भविष्यात गोवा प्रत्येक क्षेत्रात कैकपटीने भरारी घेईल हेच सिद्ध होत असून तेच त्याचे पुरावे आहेत, असेही डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.









