गोडोली / प्रतिनिधी :
सातारा शहर आणि परिसरात जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने पुढील तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही. विसावा जलशुद्धीकरण केंद्रात असलेल्या जलवाहिनीवर तब्बल 10 फुट काँक्रीट फोडून गळती काढावी लागणार असल्याने गोडोली, विलासपूर, संभाजीनगर, गोळीबार मैदान, शाहूपुरी, सदरबाजार आणि खिंडवाडी परिसरात भर पावसाळ्यात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
नदीवर पूर परिस्थिती कायम असताना पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुरळीत पाणी पुरवठा केला गेला. मात्र शनिवारी 24 रोजी सकाळी विसावा जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने पाणी पुरवठा बंद ठेवावा लागला. पुढील तीन दिवस गळती काढण्यासाठी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोडोली, विलासपूर, संभाजीनगर, गोळीबार मैदान, शाहूपुरी, सदरबाजार आणि खिंडवाडी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. गुरुवारपासून पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल असे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे आणि उप अभियंता शिवाजी माने यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.









