ऑनलाईन टीम / पुणे :
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या निवारण कार्यात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामे पूर्णत्वास न्यावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व तयारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी राम याांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. जिल्हयातील सर्व धरणांचे बांधकाम तपासणी पावसाळयापूर्वी करुन घ्यावी. धरणांचे गळतीबाबत पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करावी. पाटबंधारे विभागाने जिल्हयातील सर्व धरणांच्या धरण सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे. तसेच नदीपात्रालगत, पात्रातील झोपडपट्टया व इतर धोक्यांच्या ठिकाणाचा अभ्यास करुन त्याची माहिती घेवून नदीपात्रातील अतिक्रमणे काढावीत.
पुढे ते म्हणाले, जिल्हा शल्यचिकीत्सकांनी व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. आपत्कालीन ॲम्ब्यूलन्सचा टोल फ्री क्रमांक सर्व विभागांना देण्यात यावा. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी, कर्मचारी यांचे पत्ते व संपर्क क्रमांकासह जिल्हा नियंत्रण कक्षास यादी सादर करावी. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये शहरात व ग्रामीण भागात कोरोनाबरोबरच इतर साथीच्या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याच बरोबर कृषी विभागाने गारपीट, अवकाळी पाऊस झाल्यास, शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळपिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.








