पेंदशासनाच्या निर्णयाच्या ग्राहक पंचायतीकडून स्वागत
प्रतिनिधी / वैभववाडी :
विविध मिठाईच्या दुकानांमध्ये ट्रेमध्ये विनापॅकिंग ठेवण्यात येणारी खुली मिठाई, दुधापासून बनवलेले पदार्थ यांच्या ट्रे समोर त्या पदार्थाची ‘एक्सपायरी डेट’ (मुदतीची तारीख) टाकण्याचे केंद्र सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने बंधनकारक केले आहे. एक ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या ग्राहक हिताच्या निर्णयाचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभागाचे प्रभारी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील जिल्हा संघटक एकनाथ गावडे व कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर यांनी स्वागत केले आहे.
मिठाई, दुधापासून बनवलेल्या अनेक पदार्थांसह वेगवेगळय़ा प्रकारचे अन्न पदार्थ मिठाई किंवा इतर पदार्थ दुकानात ट्रेमध्ये भरुन खुले ठेवून विक्री केली जाते. विनापॅकिंग असणारा पदार्थ कधी बनवला आहे किंवा बनवण्यापासून ते किती दिवस खाण्यासाठी उपयुक्त आहे, हे ग्राहकांना माहिती नसते. शहरासह ग्रामीण भागात मिठाई दुकानात सर्रास असे ट्रेमधील मिठाई व अन्नपदार्थ विक्री केले जातात. उघडय़ावर ठेवलेली मिठाई, अन्नपदार्थ खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार घडतात. अशा पदार्थांसमोरील ट्रे समोरच मुदत संपत असल्याची तारीख दिल्यास ग्राहकांना त्यांची माहिती मिळणार आहे. यामुळे खराब मिठाईची विक्री होणार नाही. याबाबत आदेश शुक्रवारी केंद्र सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने काढले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांनीही जागृत व सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
मिठाईच्या दुकानांमध्ये मिठाई किंवा इतर अन्नपदार्थांची उघडय़ावर विक्री होते. त्यांना आता या पदार्थांच्या ट्रे समोर एक्सपायरी डेट लिहिणे बंधनकारक असेल. हा चांगला निर्णय असून राज्यात त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोना काळात लोकांनीही अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.









