प्रतिनिधी/ ेळगाव :
जिल्हय़ातील दिव्यांगासाठी अनुकुल ठरावे या दृष्टीने सरकार वतीने आणि दिव्यांग कल्याण खात्याच्या वतीने तिचाकी वाहनाचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी गुरूवारी जिल्हा पंचायत कार्यालयात दिव्यांगांकडून अर्ज स्विकारण्यात आले. त्या अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. गुरूवारी जिल्हय़ातील बेळगाव विभागातून 139 अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हय़ात एकूण 275 तीन चाकी वाहने पात्र दिव्यांगाना देण्यात येणार आहेत. जानेवारीमध्येही दिव्यांगांकडुन अर्ज मागविण्यात आले होते. त्यावेळी 400 हून अधिक जणांनी अर्ज दाखल केले होते. एकुण 500 हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
या सर्व अर्जांची पडताळणी होणार असून, पात्र 275 दिव्यांगांना 3 चाकी वाहनांचे भाग्य लाभणार आहे. बुधवारी चिकोडी विभागातील दिव्यांगांचे अर्ज स्विकारण्यात आले होते. जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी नामदेव बिलकर यांच्यासह जि. पं. चे प्रकल्प अधिकारी ए. बी. पाटील, महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज वरवट्टी यांच्यासह आरटीओचे निरीक्षक यांच्यावतीने अर्जांचा स्विकार करून पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. येत्या 15 जुलै पर्यंत हे काम पूर्ण होणार असून, जिल्हय़ातील पात्र 275 दिव्यांगांची तिचाकी वाहनासाठी निवड करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी नामदेव बिलकर यांनी यावेळी दिली. दरम्यान जिल्हा पंचायत सभागृहात अर्ज स्विकारताना आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती. सामाजिक अंतर राखण्याबरोबरच सर्वांना सॅनिटायझर आणि मास्क घालण्याची सूचना करण्यात आली होती.
बेळगाव विभागातील बेळगाव, गोकाक, रामदुर्ग, बैलहोंगल, अथणी, रायबाग आदी तालुक्यातील दिव्यांगांकडून अर्ज स्विकारण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघातून किमान 15 दिव्यांगांची निवड करण्यात येणार असून, यासाठी विशेष मापदंड ठेवण्यात आले आहेत. निवड झालेल्या पात्र दिव्यांगांना जुलै 15 पर्यंत 3 चाकी वाहन देण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.









