पैकी 95 टक्के अर्ज मुंबई, ठाणे, पुणे, पालघरमधील : चाकरमानी आल्यास ग्राम समित्यांमार्फत पूर्वतयारीही सुरू
- जिल्हय़ाबाहेर जाण्यासाठी 6,746 अर्ज दाखल
- गोव्यातून बुधवारी 106 मुले जिल्हय़ात दाखल होणार
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाबाहेर जाण्यासाठी आतापर्यंत तब्बल 6 हजार 746 जणांनी विनंती अर्ज दाखल केले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये येण्यासाठी 9 हजार 27 जणांनी अर्ज दाखल केले असून त्यातील 95 टक्के नागरिक हे मुंबई, ठाणे, पुणे, पालघर या ठिकाणचे आहेत. तर 454 नागरिक इतर राज्यांतील आहेत. मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणच्या नागरिकांनी अर्ज केले असले, तरी शासनाने कामगार, यात्रेकरू व विद्यार्थ्यांसाठीच येण्याजाण्याची परवानगी दिलेली आहे. सर्व नागरिकांसाठी परवानगी दिलेली नाही. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हय़ातून 164 जणांना जिल्हय़ाबाहेर पाठवण्यात आले आहे. तर बुधवारी गोवा राज्यातून 106 मुले सिंधुदुर्गात दाखल होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिली.
दरम्यान मुंबईतील चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली नसली, तरी चाकरमानी सिंधुदुर्गात आल्यास त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी ग्राम समित्यांमार्फत पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात अडकलेल्या कामगार, यात्रेकरू व विद्यार्थी अशा 6 हजार 746 जणांनी आतापर्यंत जिल्हय़ाबाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. त्यातील 5 हजार 273 नागरिक हे राज्यातील आहेत. तर उर्वरित नागरिक हे 16 राज्यातील आहेत, अशी माहिती मंगेश जोशी यांनी दिली.
जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांनीही मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 9 हजार 27 नागरिकांनी जिल्हय़ात येण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील फक्त 454 नागरिक हे इतर राज्यातून येणार आहेत. तर उर्वरित सर्व नागरिक मुंबई, ठाणे, पुणे व पालघर या ठिकाणाहून येण्यास इच्छुक आहेत. जिल्हय़ाबाहेरून येण्यासाठी मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल झाले असले, तरी इतर राज्यात व महाराष्ट्र राज्यात जे कामगार, यात्रेकरू व विद्यार्थी अडकलेले आहेत, अशा नागरिकांनाच प्राधान्याने जिल्हय़ात येण्याची परवानगी दिली जाणार आहे. मुंबईतील नागरिकांना जिल्हय़ात येण्यासाठी अद्याप शासनाने कोणतीही परवानगी दिलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हय़ाबाहेर जाण्यासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांची छाननी करून त्यांची योग्य ती आरोग्य तपासणी करून जिल्हय़ाबाहेर पाठवण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन दिवसांत 164 जणांना जिल्हय़ाबाहेर पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 129 नागरिक हे राज्यस्थानमधील, 24 उत्तरप्रदेशमधील, तर 11 नागरिक हे हैदराबादमधील आहेत. तसेच गोवा राज्यामध्ये 254 नागरिक अडकलेले असून पहिल्या टप्प्यात 106 मुलांना बुधवारी आणण्यात येत आहे. याबाबत गोवा राज्य शासनाची परवानगी घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तसेच आरोग्य तपासण्याही करण्यात आल्या आहेत. उर्वरित नागरिकांना दुसऱया टप्प्यात आणले जाणार आहे.
इतर राज्यात जे लोक अडकलेले असतील, त्यांना आणण्यासाठी त्या-त्या राज्याच्या शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांना आणत असताना त्याठिकाणी आरोग्य तपासणी करूनच जिल्हय़ात आणले जाणार आहे. तसेच जिल्हय़ात आल्यानंतर जिल्हय़ातही आरोग्य तपासणी करुन संस्थात्मक क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. बुधवारी 106 मुले गोवा राज्यातून आल्यावर सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या सीमेवरच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन ते ग्रीन झोनमधून येत असल्याने होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
ग्रामपातळीवर संस्थात्मक अलगीकरण व्यवस्था पाहण्यासाठी ग्रामस्तरावर संबंधित गावचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय हेल्पलाईन क्रमांक 02362-228796 सुरू करण्यात आला आहे.
चाकरमान्यांसाठी परवानगी नाही, मात्र पूर्वतयारी सुरू
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अनेक लोक मुंबई शहरामध्ये कामानिमित्त आहेत. यातील अनेकजण गावी येण्यासाठी प्रयत्नरत आहेत. परंतु, मुंबई शहरात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुंबई हॉटस्पॉट झाल्याने चाकरमान्यांना आणण्याची मोठी अडचण आहे. राज्य शासनानेही चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. असे असले, तरी जिल्हय़ात भविष्यात चाकरमानी वेगवेगळ्य़ा कारणांनी येऊ लागल्यास त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक गावात ग्राम समित्यांमार्फत शाळांची स्वच्छता करणे तसेच गावामध्ये धर्मशाळा, भक्तनिवास, हॉटेल्स किंवा अन्य राहण्याची व्यवस्था असेल, तर ती पूर्व तयारी म्हणून अधिग्रहित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.









