प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्य़ात खऱया अर्थाने आगमन झालेल्या ‘मान्सून’ ने गुरूवारी धडक मारली. या दमदार आगमन करणाऱया मान्सूनमुळे जिह्यात जवळपास सर्वच ठिकाणी यादिवशी सायंकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिह्यात 203 मिलीमीटर पाऊस झाला याची सरासरी 22.56 मिमी आहे.
जिल्ह्य़ात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या आगमनानंतर अधूनमधून कोसळत होत्या. त्यानंतर मात्र खऱया अर्थाने ‘मान्सून’च्या आगमनाची साऱयांनाच प्रतिक्षा लागून राहीली होती. गुरुवारी दुपारनंतर मान्सून जिल्ह्य़ात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी पावसाला सुरुवात झाल्यापासून तो ठराविक काळाने सरीवर सरी होवून कोसळत आहे.
गेल्या 24 तासात सर्वाधिक 66 मिमी पाऊस राजापूर तालुक्यात झाला आहे. लांजा तालुक्यात 40 मिमी आणि रत्नागिरीत 34 मिमी पावसाची नोंद झाली. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेला दापोली तालुक्यात 21 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र मंडणगड तालुक्यात पाऊस पडलेला नाही. गुहागर, खेड आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी 10 मिमी तर संगमेश्वर तालुक्यात 12 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाळ्यात आत्तापर्यंत जिह्यात 289.44 सरासरीने 2605 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. येणाऱया 24 तासात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.









