वार्ताहर/ रामदुर्ग
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. रामदुर्ग तालुक्यात आठ मतदान केंद्रांमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्याने मतदान उशिरा सुरू झाले. मात्र, कर्मचाऱयांनी लागलीच समस्या दूर करत मतदानास प्रारंभ केला. त्याचबरोबर तालुक्यातील चिक्कतडशी व हिरेतडशी ग्रामस्थांनी ग्राम स्थलांतर करण्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला. पण, एकंदरीत तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. सकाळी उत्साहात, दुपारी कमी प्रमाणात पुन्हा सायंकाळी जोरदार मतदान झाल्याचे पहावयास मिळाले. मतदानावेळी तालुक्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही.
आमदार महादेवप्पा यादवाड यांनी बटकुर्की येथील मतदान केंद्रात मतदान केले. तर माजी आमदार अशोक पट्टण यांनी शहरातील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. शहरातील भाग्यनगर व तालुक्यातील हुलकुंद या दोन ठिकाणी पिंक (सखी) मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. याठिकाणी महिला कर्मचारी पिंक साडी परिधान करून कार्यरत होत्या. तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यानंतर मलप्रभा नदीकाठावर चिक्कतडशी व हिरेतडशी गावे आहेत. मात्र, महापुरात या गावांना मोठा फटका बसून जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे दोन्ही गावांचे स्थलांतर करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. मात्र, या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. तसेच जोपर्यंत आमचे स्थलांतर होत नाही, तोपर्यंत आम्ही आगामी प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. चिक्कतडशी व हिरेतडशी या गावांमध्ये दोन मतदान केंद्रे असून 229 केंद्रामध्ये 570 तर 229 अ केंद्रामध्ये 603 मतदार आहेत. ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातल्याने साहाय्यक निवडणूक अधिकारी अशोक गुराणी यांनीही भेट देऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
यानंतर प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी अभिषेक व्ही., तहसीलदार ए. डी. अमरवाडगी, डीवायएसपी रामनगौडा हट्टी, पीएसआय निंगगौडा कट्टीमनीगौडर आदी अधिकाऱयांनी गावांना भेटी देऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. यावेळी गावप्रमुख आय. एस. हरनट्टी, सोमरेड्डी गोंदी, हणमरेड्डी गोंदी, शिवप्पा हरनट्टी, हणमंत हळ्ळी, विरुपाक्षगौडा कुलकर्णी, बसवराज खानापूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.








