शिवसेनेचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन
प्रतिनिधी / सरवडे
बिद्री साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी दूधगंगा नदी पात्रात मिसळत असल्याने राधानगरी व कागल तालुक्यातील अनेक गावच्या नदी काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत योग्य कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, बिद्री साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी दूधगंगा नदीत सोडले जात आहे त्यामुळे राधानगरी व कागल तालुक्यातील दूधगंगा नदी काठच्या अनेक गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत योग्य कारवाई होण्यासाठी प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अर्जुन जाधव यांनी मळी मिश्रीत पाण्याचे नमुने घेतले होते मात्र त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे कारखाना आजही मळी मिश्रित पाणी नदीत सोडत आहे. पाण्याला सुटलेल्या दुर्गंधीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंधरा दिवसातून एकदा कारखान्यातील मळी मिश्रित पाणी नदीत सोडण्यात येते. मळी नदीत मिसळल्याने नदीकाठावरील सुमारे ५० ते ६० गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक नागरिक गॅस्ट्रोने आजारी आहेत. नदीतील मृत माशांचा खच व दुर्गंधीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिद्री, वाळवे खुर्द, कसबा वाळवा, कासारवाडा, चंद्रे, चांदेकरवाडी, पालकरवाडी, सोनाळी, बेलवळे खुर्द,बेलवळे बुद्रुक, केंबळी, बाचणी आदी गावातील नागरिक आजारी आहेत.
बिद्री कारखान्याने दूधगंगा नदीत सोडले जाणारे पाणी त्वरित बंद करावे, कारखान्याची बयाना रक्कम जप्त करावी, कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, कारखाना मंजूर क्षमतेपेक्षा जादा उसाचे गाळप करतो ऊस ऊस गाळप क्षमतेनुसार आधारित नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प बसवण्याची कारखान्याला सक्तीचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना देण्यात आल्या आहेत.









