राज्य सरकारने कोरोना बाधितांवर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे अशा बाधितांनाच संबंधित इस्पितळात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्याचा सल्ला तज्ञ समितीने दिला आहे. यापुढे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच त्यांना इस्पितळात हलवणार नाहीत.
कर्नाटकात कोरोना रुग्ण संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 5 हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. बुधवारी एका दिवसात 8 हजार 500 हून अधिक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ऑगस्टमध्ये रुग्ण संख्येत वाढ होणार असे तज्ञ समितीने सांगितले होते. आता सप्टेंबर अखेरपर्यंत कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या आणखीन वाढणार, अशी भीती आहे. पुढच्या महिनाभरात एकूण बाधितांची संख्या 5 लाखाहून अधिक असणार आहे, असा इशारा तज्ञ समितीने दिला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता रुग्ण संख्या वाढणार असे दिसून येते. म्हणून राज्य सरकारने बाधितांवर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे अशा बाधितांनाच संबंधित इस्पितळात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्याचा सल्ला तज्ञ समितीने दिला आहे. यापुढे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच त्यांना इस्पितळात हलवणार नाहीत.
केवळ पाच महिन्यात एकूण बाधितांच्या संख्येने 5 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. कर्नाटकात 9 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. 15 मे रोजी एकूण बाधितांची संख्या 1 हजारावर पोहोचली होती. 1 हजाराचा टप्पा गाठायला सुरुवातीच्या काळात दोन महिने लागले होते. त्यानंतर रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आली. 26 ऑगस्ट रोजी एकूण बाधितांच्या संख्येने 3 लाखांचा आकडा पार केला. 11 मार्च रोजी कोरोना बाधिताचा पहिला मृत्यू झाला होता. आता मृतांच्या आकडय़ानेही पाच हजाराचा टप्पा पार केला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे साहजिकच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. यातच राज्य सरकारने तपासणी वाढविण्यासाठी आरोग्य विभागाला टार्गेट दिले होते. या टार्गेटमुळे एका तालुका वैद्यकीय अधिकाऱयावर आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यामुळे सरकारी डॉक्टरांनी संपाचा पवित्रा घेतला होता. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिलेल्या आश्वासनानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला.
नंजनगुडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. एस. नागेंद्र यांनी गेल्या आठवडय़ात आत्महत्या केली. म्हैसूर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांतकुमार मिश्रा यांनी तपासणी वाढविण्यासाठी केलेल्या छळामुळे डॉ. नागेंद्र यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतरच सरकारी डॉक्टरांनी संपाचा पावित्रा घेतला होता. एकीकडे सरकारी इस्पितळात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांची अपुरी संख्या आहे. कोरोना महामारीचा फैलाव वाढत असताना आहे त्या मनुष्यबळावर अतिरिक्त ताण पडत आहे. यातच तपासणी वाढविण्याची सक्ती करण्यात आली आहे. या सक्तीमुळे बाजारपेठ, बस स्थानकावरही स्वॅब तपासणी सुरू झाल्या आहेत. इतर आजारांवर उपचारासाठी सरकारी इस्पितळात जाणाऱयांची कोरोना चाचणी सक्तीने केली जात आहे. सर्वसामान्यांना तर ते कटकटीचे ठरत आहेच. याबरोबरच सरकारी यंत्रणेवरही याचा ताण पडत आहे.
तालुका आरोग्याधिकाऱयाच्या आत्महत्येनंतर म्हैसूर जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱयाची बदली करण्यात आली. आत्महत्या आणि बदली यामुळे कर्नाटकात डॉक्टर विरुद्ध आयएएस अधिकारी असा नवा संघर्ष सुरू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी संपाचा निर्णय घेतलेल्या सरकारी डॉक्टरांशी चर्चा करून या संघर्षावर पडदा टाकला. अधूनमधून आयएएस विरुद्ध इतर शासकीय अधिकारी असे संघर्ष होतच असतात. आयएएस अधिकारी कोणाचेच ऐकत नाहीत. ब्रिटीशांची सत्ता गेल्यानंतर त्याच रुबाबात सध्याचे आयएएस अधिकारी वावरतात. त्यांना गाडी, बंगला, नोकर चाकर आदी सर्व सोयीसुविधा असतात. त्यामुळेच तळागाळात काम करणाऱयांच्या वेदना त्यांना कळत नाहीत, असा नेहमी त्यांच्यावर आरोप होत असतो. पण सध्या आरोप, प्रत्यारोप आणि संघर्ष करण्याची ही वेळ नाही. सरकारी इस्पितळात कोरोना उपचार सुरू झाले त्यावेळी सुरुवातीला डॉक्टर, परिचारिका यांच्यावर फुलांचा वर्षाव करून कोरोना योद्धे असा त्यांचा गौरव झाला. लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्त करणाऱया पोलिसांवरही फुलांचा वर्षाव झाला. आता परिस्थिती बदलते आहे. एक तर कोरोनाची बाधा होऊन त्यांना आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नाही तर दडपणामुळे त्यांना जीवन संपविण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभराच्या काळात त्यांनी अनेक आव्हाने पेलली. 30 ऑगस्ट रोजी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. पुढील दोन वर्षांत कर्नाटकात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. भाजपने आता पक्ष संघटनेवर अधिक भर देण्याचे ठरविले आहे. ज्या ज्या जिह्यात संघटना कमकुवत आहे अशा जिह्यांवर अधिक भर देण्याचे ठरविण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदाचा गणेशोत्सवही साध्या पद्धतीने सुरू आहे. जगप्रसिद्ध म्हैसूर दसराही यंदा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. जंबो सवारी व सांस्कृतिक कार्यक्रम असणार की नाही याचा निर्णय अद्याप झाला नाही. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री येडियुराप्पा उत्तर कर्नाटकाच्या दौऱयावर आले होते. एका बेळगाव जिह्यात 972 कोटी रुपयांची हानी झाली आहे.








