केजरीवाल यांची भाजप-काँग्रेसवर टीका : दोघांनीही गोव्याला लुटल्याचा आरोप,आपकडून जनतेला अपेक्षा असल्याचा दावा
प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास प्रत्येक गोमंतकीयास दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज, 24 तास अखंड वीजपुरवठा, थकीत वीजबिले माफ आणि शेतकऱयांना मोफत वीज देण्यात येईल, अशा पॉवरफूल घोषणा आपचे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केल्या आहेत. त्याद्वारे पुढील वर्षी राज्यात होणाऱया विधानसभा निवडणूक प्रचाराचाही त्यांनी अप्रत्यक्ष शुभारंभ केला.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मगो नेते सुदिन ढवळीकर यांच्याशी आपण केवळ राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. युती किंवा अन्य कोणताही विषय त्यावेळी आला नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. ऑगस्ट महिन्यात आपण पुन्हा गोव्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यात स्वच्छ व पारदर्शक सरकार देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. हे केवळ निवडणुकीचे आश्वासन नव्हे तर ’आपण जे बोलतो ते करून दाखवतो’, अशी हमीही त्यांनी दिली.
नेते, कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी
मंगळवारी गोव्यात दाखल झालेल्या केजरीवाल यांनी दोन दिवसांच्या भेटीत अनेक राजकीय नेते, पक्ष कार्यकर्ते, यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यातून गोव्यातील विद्यमान राजकारणाला लोक प्रचंड कंटाळले असल्याचे दिसून आले. त्यामुळे पर्याय म्हणून गोमंतकीय आपकडे आशेने पाहात आहेत व आपला चांगले भवितव्य असल्याचे स्पष्ट झाले, असे केजरीवाल यांनी पुढे सांगितले.
काँग्रेसने आमदार भाजपला विकले
भाजपला कंटाळलेल्या गोमंतकीयांनी बदलाच्या अपेक्षेने काँग्रेसला बहुमत दिले. त्यांचे 17 आमदार निवडून दिले तर भाजपचे केवळ 13 आमदार विजयी झाले. परंतु काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे आज 28 आमदारांसह भाजपच सत्तेत आहे. काँग्रेसने आपले आमदार भाजपला विकले व भाजपने सत्तेसाठी काँग्रेसचे आमदार चोरले. या दोन्ही पक्षांनी गोमंतकीयांचा केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वासघात आहे, असे केजरीवाल म्हणाले.
दिल्लीकरांना आपचा चांगला अनुभव
अशा या विश्वासघातक्यांना गोमंतकीय कधीही माफ करणार नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा बदलासाठी मतदान करणार आहेत. गोमंतकीयांना मतपरिवर्तन हवे आहे. दिल्लीतील काँग्रेसला आपने कसे सत्तेबाहेर काढले व स्वच्छ राजकारण आणले, जो विकास साधला, पायाभूत सुविधा निर्माण केल्या, त्यांचा अनुभव लोकांनी घेतला आहे. गोमंतकीयांनाही आपकडून तीच अपेक्षा आहे, असे केजरीवाल म्हणाले.
राजकीय घोषणा नव्हे, वचन!
हे सर्व लक्षात घेऊन गोमंतकीयांच्या मागणीनुसार मला राज्यातील वीज समस्येवर पहिली हमी द्यायची आहे, त्यानुसार ठराविक मर्यादेपर्यंत दरमहा वीज मोफत देण्याचे आश्वासन देत असून त्याची अंमलबजावणीही करणार आहे. अन्य पक्षांप्रमाणे ही केवळ राजकीय घोषणा नाही. तर ते वचन आहे, असेही ते म्हणाले. राज्यात काही मतदारसंघात आमदार लोकांची वीज बिले भरतात. यापुढे तो प्रसंग येणार नाही. लोकांना आमदारांवर अवलंबून राहावे लागणार नाही. प्रत्येकाचे बील शून्य रकमेचेच असेल, दिल्लीत हेच घडत आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.
काजू शेतकऱयांच्या शिष्टमंडळाचे निवेदन
गोव्यातील काही काजू शेतकऱयांच्या शिष्टमंडळाने केजरीवाल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ज्यामध्ये त्यांनी काजू शेतीसंदर्भात एमएसपीशी संबंधित मुद्यांचा उल्लेख केला व हा मुद्दा घेऊन शेतकऱयांच्या वतीने आवाज उठवावा, असे आवाहन केले, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.
गोव्यात नवीन चेहरे आणण्याविषयी बोलताना केजरीवाल यांनी लोक जेथे जेथे काँग्रेसला मत देतात तेथे भाजपचे सरकार स्थापन होते. देशात अनेक राज्यानी हा अनुभव घेतला आहे. गोव्यातील जनतेला हे समजून चुकले आहे. त्यामुळे जुने पक्ष आणि त्यांचे जुने राजकारण बदल घडवू शकत नाही. त्यांना त्यांच्याकडून आता काहीच अपेक्षा नाहीत. त्यांना नवीन चेहरे हवे आहेत., असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस त्यांच्या सोबत आपचे संयोजक राहूल म्हांबरे, उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, सुरेल तिळवे आणि सांगेच्या माजी सरपंच गौरेषा गावकर यांची उपस्थिती होती.









