रिसोर्स बँकतील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री साधणार थेट संवाद
प्रतिनिधी / सांगली
राज्यस्तरीय रब्बी हंगाम 2020 मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे दि. 1 जुलै 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता कृषी दिन कार्यक्रमामध्ये सत्कार होणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या युट्यूब चॅनेल www.youtube.com/C/AgricultureDepartmentGoM वरून होणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देवून 21 जून 2021 ते 1 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पडत आहे. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या कृषि दिनी कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप आहे.
कृषी विभागामार्फत सन 2020 च्या रब्बी हंगामाचे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीच्या पीकस्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले असून प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते कृषी दिन कार्यक्रमामध्ये सत्कार होणार आहे.








