भाजपच्या सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत शेतकऱयांना मदतीचा हात : अतुल काळसेकर यांची माहिती
प्रतिनिधी / कणकवली:
भारतीय जनता पार्टीच्या सिंधु आत्मनिर्भर अभियानने शेतकऱयांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोठय़ा प्रमाणात हळद लागवड करणारे बचतगट किंवा शेतकरी यांना अभियानाच्या माध्यमातून कमी दरात हळद बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. सवलतीचा दर म्हणून 36 रुपये प्रतिकिलो निश्चित करण्यात आलेला आहे. सदरचे सेलम जातीचे हळद बियाणे सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत डॉ. हेडगेवार प्रकल्प माणगांव येथे उपलब्ध करण्यात आले असल्याचे सिंधु आत्मनिर्भर अभियानचे संयोजक अतुल काळसेकर यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाला सुरुवात केलेल्या सिंधु आत्मनिर्भर अभियानाने गेल्यावर्षी मोठय़ा प्रमाणावर हळद लागवडीचा प्रयोग जिह्यात यशस्वी केला. सिंधु आत्मनिर्भर अभियानाला भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगाव तसेच के. एस. आर. इंटरप्रयझेस डोंबिवली या संस्थांनी सहकार्य केले. या अभियानातून प्रेरणा घेत जिल्हा परिषदेच्या उमेद अंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून हळद लागवडीचे मोठे अभियान जिह्यात उभे राहिले. त्यामुळे यावेळी सिंधु आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून रास्त दरात हळद बियाणे देत हे अभियान अजून जोमाने सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
सिंधु आत्मनिर्भर अभियान, माध्यमातून यापूर्वी वितरित केलेले मोफत हळद बियाणे, योग्य मार्गदर्शन आणि उत्पादन पश्चात प्रक्रिया आणि विक्री याची जिल्हय़ात यंत्रणा उभी राहिली. बाजारात असलेला हळद बियाण्याचा दर, जो आज रोजी 70 ते 90 रुपये प्रतिकिलो इतका आहे, यासोबत इतर सर्व खर्च आणि होणारे उत्पन्न लक्षात घेता या हळद शेतीचे गणित जुळेल का? सध्या हळद बियाणे जिह्याबाहेरून उपलब्ध करावे लागते. त्यामुळे जिह्यात ‘हळद बियाणे बँक’ तयार करण्याची आमची संकल्पना असल्याचे काळसेकर यांनी म्हटले आहे.
जागतिक तापमानवाढीचा परिणाम सर्वत्र दिसत असून अशावेळी बहुआयामी पीक पद्धती महत्त्वाची आहे. जिह्यात काजू, आंबा, नारळ, सुपारी आणि भातशेतीसोबत हळद आंतरपीक म्हणून सहाय्यकारी ठरेल. याला कीड रोगाचा त्रास फार कमी तसेच वन्यप्राण्यांपासून सुरक्षीत असे पीक आहे. युरोपमध्ये तर याला पिवळे सोने (यलो गोल्ड) म्हटले जाते. कोविडनंतर चर्चेत असणारी हळद औषध म्हणून मोठय़ा प्रमाणात उपयुक्त ठरेल.
सिंधु आत्मनिर्भर अभियान या ऑरगॅनिक हळदीचा एक मालवणी ब्रँड बाजारात आणण्याच्या विचारात असून मुंबईतील चाकरमानी मंडळींना तो ‘क्लिक’ होईल. टाटा समूहाच्या ‘करार शेती’च्याधर्तीवर हळद लागवडीची करार शेती पद्धत रुजू करणे, त्या पद्धतीचे सेलम हळद हे एक मॉडेल होईल. आपल्या कृषी विभागाला ही एक मोठी संधी आहे. कृषी विद्यापीठाने यावर संशोधन सुरू करावे. अभियानाचे सर्व सदस्य सोबत असतील, सर्व यंत्रणा लागली तर याविषयात जादू होईल, असा विश्वास श्री. काळसेकर यांनी व्यक्त केला.
जिह्यातील महामार्गाच्या दुभाजकामधील मोकळय़ा जागेत हळद लागवडीची कल्पना आहे. ग्रामसंघ, बचतगट, शेतकऱयांनी जबाबदारी घ्यावी. ग्रामसंघांनी किमान 25 किलो हळद बियाणे लागवड करावी, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व शाळा परिसरात हळदीची लागवड करण्याचा प्रयत्न आहे. ज्या संस्था त्यासाठी पुढाकार घेतील त्यांना अभियानाच्या माध्यमातून रास्त दरात बियाणे आणि मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे काळसेकर यांनी म्हटले आहे.









