‘हरिभजनाविण काळ घालवू नको रे’ असा अभंगाद्वारे संदेश देणारे गोमंतकीय संतकवी सोहिरोबानाथ आंबये यांचे सहावे वंशज डॉ. रामकृष्ण ऊर्फ मधूभाई यशवंत आंबिये यांच्या रक्तातच समाजकारण भिनलेले आहे.
निवृत्तीनंतर त्यांचे समाजकार्य जोमाने वाढलेले आहे. आज जरी वयाने ते 90 वर्षाचे असले तरी समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास त्यांचा आहे. आज मुंबईत जरी त्यांचे वास्तव्य असले तरी गोव्यातील मूळ पालये-पेडणे गावाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. येथेही समाजकार्य सुरू आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपले पालये गावात येणे-जाणे असेल, असा त्यांचा ध्यास आहे.
ज्याप्रमाणे संत सोहिरोबानाथांनी आपल्या साहित्याद्वारे आध्यात्मिक कवाडे खुली केलीत त्याप्रमाणे पालये गाव शैक्षणिकदृष्टय़ा सुसंपन्न व्हावा असा डॉ. रामकृष्ण आंबिये यांचा ध्यास आहे व त्यादृष्टीने त्यांनी विविध उपक्रमही राबविले आहेत. ‘पालयां इलां काय बरां दिसता’, असे त्यांचे उद्गार असतात. त्यांचे हल्लीच ‘एका नाथवंशज संशोधकाचे आत्मकथन’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्याचा प्रकाशन सोहळा मुंबई येथे झाला होता. गेव्याहून साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांना या समारंभासाठी खास निमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. रामकृष्ण आंबिये यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1931 रोजी मुंबईत झाला. आज त्यांचे वय 90 वर्षाचे असून तरुणांनाही लाजवील असा त्यांचा उत्साह आहे. मिताहार, चहा सोडून एकही व्यसन नाही. फिरण्याचा व भरपूर मित्रमंडळींच्या कोंडाळय़ात वेळ व्यतित करणे, हे दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे ते म्हणतात. ते आजन्म अविवाहित असून ब्रह्मचर्य जीवन व्यतीत करीत आहेत. गोव्यात येताना बस किंवा रेल्वेने त्यांची भ्रमंती चालू असते. संतकवी सोहिरोबानाथ आंबिये जयंतीवेळी तसेच गणेश चतुर्थीच्यावेळी ते पालयेला मूळ घरी आप्तेष्ट, नातेवाईक तसेच मित्रमंडळीसोबत येतात.
डॉ. आंबिये यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथील महापालिकेच्या शाळेत झाले. नंतर राजमोहन, दुसऱया महायुद्धाच्यावेळी सिंधुदुर्गातील कुडाळ हायस्कूल, वर्षाने मुंबईला परत व एक वर्ष धगोठा हायस्कूल, मॅट्रिकपर्यंत विल्सन नंतर सायन्सला विल्सन कॉलेजात होते. आई-वडील, सहा भावंडे या परिस्थितीमुळे घरची आर्थिक स्थिती जेमतेम तर मित्र-नातलगांनी केलेले आर्थिक साहाय्य, शिष्यवृत्ती यांच्या जोरावर त्यांनी मुंबईतील कॅन्सर रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये संशोधन करून डॉक्टरेट मिळविली व यथावकाश तेथे विभागप्रमुखपदही मिळविले. टाटा स्मारक केंद्रात कर्करोग व संबंधित संशोधन कार्यात वावरताना नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ तसेच अन्य अनुभवसंपन्न शास्त्रज्ञ यांच्याशी त्यांच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. अमेरिकन सरकारची ‘फुलब्राईट-हेज’ ही पाठय़शिष्यवृत्ती त्यांना लाभलेली होती. येथेही त्यांनी कर्करोगविषयक संशोधन केले आहे. कुटुंबातला मोठा मुलगा म्हणून वडिलांच्या निधनानंतर त्यांनी भावंडांचा भार खांद्यावर घेतला. कुठेही आत्मप्रौढी नाही अथवा कुणाबद्दल तक्रार नाही. अजातशत्रू. उलट आयुष्य रसिकतेने व चवीचवीने जगण्याची ओढ. अमेरिकेत संधी असताना भारतात परत येऊन इथल्या रामरगाडय़ात त्यांनी स्वतःला झोकून दिले. डॉ. आंबिये यांनी जीव-रसायनशास्त्राच्या क्षेत्रात पीएचडी मिळविली. कॅन्सर व जैव-वैद्यकीय शास्त्रात 35 वर्षे संशोधन केलेले आहे. शिक्षणाविषयीची आत्यंतिक ओढ, उदारमतवादी दृष्टिकोन, विज्ञानाचे अभ्यासक असूनही मानव्यविद्या, जीवन समृद्ध करणाऱया अनेक कला याविषयी त्यांना आस्था वाटते. संवादातून त्यांची समाजाविषयीची ओढ तसेच रसिकता दिसून येते. डॉ. आंबिये जरी विज्ञान क्षेत्रात अनेक वर्षे वावरले तरी क्रीडा, संगीत, नाटय़ याविषयी त्यांचे प्रेम आहे. अनेक कलाकारांच्या ते संपर्कात आहेत. मुंबई येथे वास्तव्यास असले तरी गोव्यातील पेडणे तालुक्यातील पालये गावचे हृदयबंध त्यांनी टिकवून ठेवले आहेत.
डॉ. आंबिये यांचे मुंबईमधील चिखलवाडीतल्या भागीरथी निवासमध्ये काही काळ वास्तव्य होते. ते आता परळ-मुंबईला राहत असले तरी जुन्या जागी, जुनी माणसे यांच्याकडे त्यांच्या चकरा चालू असतात. ‘खेडय़ामधले घर कौलारू’प्रमाणे गोव्यातील बावाखानवाडा-पालये (ता. पेडणे) येथील संत सोहिरोबानाथ आंबिये वास्तू वडिलोपार्जित घर त्यांना खुणावत असते. दरवर्षी होणाऱया संतकवी सोहिरोबानाथ जयंतीवेळी तसेच गणेश चतुर्थीवेळी ते याठिकाणी उपस्थिती लावतात. याठिकाणी येऊन आपल्याला समाधान लाभत असल्याचे डॉ. आंबिये म्हणतात.
गोव्यातील बावाखानवाडा-पालये (ता. पेडणे) येथील वडिलोपार्जित घर अर्थात संत सोहिरोबानाथ यांची तीनशे वर्षापूर्वीची माडी असलेली वास्तू अजूनसुद्धा डौलाने उभी आहे. गोवा मुक्ति संग्रामाच्यावेळी देशभरातून येणाऱया राजकीय पुढारी, कार्यकर्ते यांच्या बैठका या वास्तूच्या माडीवर भरल्या गेल्या होत्या. साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनीही या वास्तूला भेट दिली होती. विद्यार्थीवर्ग, शिक्षकवर्ग, साहित्यिक, कलाकार, डॉक्टर, वकील, सरकारी अधिकारी, मंत्रिगण यांनी या नाथांच्या वास्तूला भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. ज्येष्ठ संवादिनीवादक पं. तुळशीदास बोरकर यांनीही आमच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी एक सोलो कार्यक्रम घडवून आणला होता, असे डॉ. आंबिये अभिमानपूर्वक सांगतात. यातून डॉ. आंबिये यांचे कलारसिकत्त्वही दिसून येते.
डॉ. आंबिये यांना वाचनाचे भारी वेड आहे. गोवाविषयक, व्यक्तीविषयक जे-जे काही साहित्य प्रसिद्ध होते त्याचे ते संग्रह करीत असतात. हल्लीच त्यांचा मुंबई येथे प्रसिद्ध होणाऱया ‘सारस्वत चैतन्य’ या नियतकालिकेमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयी लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखाबद्दल आपले कौतुक झाल्याचे डॉ. आंबिये अभिमानाने सांगतात.
समाजकारण हे त्यांच्या रक्तातच आहे. आयुष्याच्या 35 वर्षे डॉ. रामकृष्ण आंबिये यांनी मुंबईतील टाटा स्मारक केंद्रात निरनिराळय़ा पदांवर काम केलेले आहे. विविध विद्यापीठांत व्याख्याता व परीक्षक म्हणून काम केले. ठिकठिकाणी देशात-परदेशात संशोधन निबंधांचे वाचन केले. त्यांचे सत्तरपेक्षा अधिक शोधनिबंध विविध शास्त्रीय जर्नल्समधून प्रसिद्ध झालेले आहेत. पण निवृत्तीनंतर त्यांचे समाजकार्य अधिक फोफावले आहे. आठ ते नऊ संस्थांमध्ये ते कार्यकारिणीवर आहेत. परंतु त्यांच्याकडे ओळखीचे लोक, नातलग व विद्यार्थी यांची वर्दळ असते. केईएम, जे.जे.टाटा कॅन्सर, मोतीबेन दळवी यासारख्या रुग्णालयात रुग्णांना प्रवेश, उपचार व प्रसंगी आर्थिक मदत व इतर देखरेख करणे हे उद्योग चालू असतात. धी गोवा असोसिएशन मुंबई या संस्थेतही ते दाखल झाले आहेत. या संस्थेच्या बैठकांना ते नियमित उपस्थिती लावतात तसेच गरजू विद्यार्थी व रुग्णांना या संस्थेतर्फे मदत मिळवून देतात. सारस्वत ब्राह्मण समाज, सारस्वत विद्यार्थी साहाय्यक मंडळी, रा. ब. एस. व्ही. राजाध्यक्ष फॉरेन स्कॉलरशिप संस्था, विल्सन हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, टाटा मेमोरियल सेंटर, पालये-पेडणे येथील आयडियल इंग्लिश स्कूल, संत सोहिरोबानाथ आंबिये स्मारक समिती गोवा अशा संस्थांशीही डॉ. आंबये यांचा संबंध आला आहे. पेडणे तालुक्यातील पालये येथील आयडियल इंग्लिश हायस्कूलच्या विकासासाठी डॉ. आंबिये यांनी शैक्षणिक शिष्यवृत्तींबरोबरच शिक्षणाला उपयोगी उपकरणे प्रदान केली आहेत. संतकवी सोहिरोबानाथ यांच्या जीवन-कार्याचा तसेच त्यांच्या साहित्याचा प्रसार विद्यार्थ्यांपर्यंत व्हावा, असाही डॉ. आंबिये यांचा ध्यास आहे. संत सोहिरोबानाथांचे पुतळे नको तर त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी सुसज्ज हॉस्पिटल व्हावे, अशी डॉ. आंबिये यांची सरकारकडे मागणी आहे.
राजेश परब









