खासदार शरद पवार यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ सातारा
विज्ञानशक्तीमुळे नवीन विचार व तंत्रज्ञान आज समोर येत आहे. नव्या पिढीची जबाबदारी घेण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. रयतच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये या पुढच्या काळात आर्टीफिशीयल इंटेलिजंस हा विषय सुरु करण्याची गरज आहे. रयत शिक्षण संस्था येणाऱया काळात हे आव्हान स्वीकारणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील अनेक तज्ञांची मते घ्या, मी त्यांची भेट घालून देईन अण्णांनी ज्या गोष्टी आपल्याला शिकविल्या त्याची हल्लीच्या पिढीला पार्श्वभूमी माहीत नाही. अण्णांच्या सानिध्यात यायची संधी आपल्याला मिळाली नाही तरीही आपण आधुनिकता आणि विज्ञान घेऊन कर्मवीरांच्या विचारांचे पाईक व्हायला हवे, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये नव्याने बांधलेल्या ‘’लोकनेते रामशेठ ठाकूर भवनच्या उद्घाटन समारंभात अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील होते. खासदार श्रीनिवास पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन ऍड.भगीरथ शिंदे, लोकनेते रामशेठ ठाकूर, सौ.शकुंतला ठाकूर, मीनाताई जगधने, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, मानेन्जिंग कौन्सिलचे सदस्य इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, कोणतेही व्यक्तिमत्व घडायचे असेल तर माता, माती, आणि मातृभूमी याबद्दल आस्था असायला हवी. यातूनच राष्ट्रीय गरजांची पुरती होईल. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णा, आंबेडकर, गाडगेबाबा यांचा आधुनिक आणि नवी दृष्टी आपण रुजवली पाहिजे. इंग्रज राजाला महात्मा फुले यांनी नवी दृष्टी दिली होती. दुष्काळाच्या काळात खडी फोडायचे काम न देता पाण्याचा थेंब न थेंब वाचवून पाण्याची पातळी वाढवली पाहिजे. निसर्गाचा असमतोल थांबण्यासाठी वृक्षवाढ केली पाहिजे, या भागातील शेतकरी सतत शाळूचे पिक घेतो. त्यामुळे मातीचा कस कमी होतो. त्यासाठी विलायत आणि देशी यांचे संकरित वाण तयार केल्यास उत्पन्न वाढेल. गायीचा पूर्वीचा धंदा सोडून संकरित गायी तयार कराव्यात त्यामुळे भरपूर दुध मिळेल असे महात्मा फुले यांनी सांगितले होते. कर्मवीर अण्णा यांना फुल्यांची विचारधारा पटली होती. नवी पिढी याच विचाराने पुढे गेली पाहिजे. आपल्याला नव्या जगातील आधुनिक विचारधारा नजरेसमोर ठेवून पुढे जाण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
रामशेठ ठाकूर दानशुर व्यक्तीमत्व
रामशेठ ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजला लोकनेते रामशेठ ठाकूर भवन ही इमारत बांधून दिल्याबद्दल पवारांनी रामशेठ व त्यांच्या पत्नी शकुंतला यांचा सत्कार केला. यावेळी रामशेठ ठाकूर यांनी व शंकुतला ठाकूर यांनी सव्वा कोटी प्रमाणे अडीच कोटीचा चेक शरद पवार यांच्याकडे देणगी म्हणून सुपूर्त केला. रामशेठ यांच्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, रामशेठ हे खऱया अर्थाने रयतचे हितचिंतक आहेत. संस्थेला ज्यावेळी गरज पडते. त्याबेळी त्यांच्या मुखातून कधीच नकार येत नाही. रामशेठचे नाव घेतल्याशिवाय रायगडला पूर्णत्व नाही. रामशेठ यांनी कोणकोणत्या शाखांना कोटी रुपये दिले त्याची यादीच त्यांनी वाचून दाखवली.
खासदार श्रीनिवास पाटील, रामशेठ ठाकूर, डॉ. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. समारंभाच्या प्रारंभी प्रा.संभाजी पाटील व सहकारी यांनी रयत गीत गायन केले. रयत शिक्षण संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आर्किटेक्ट सौरभ महामुलकर, कंत्राटदार विजय जाधव, इंटेरियर डिझायनर सुहास धर्माधिकारी, माजी विद्यार्थी फिरोज मेटकरी, माजी उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे, प्रा. कविता म्हेत्रे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार उपप्राचार्य डॉ.अनिल वावरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. यावेळी रयतच्या मानेन्जिंग कौन्सिलचे सदस्य प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, ऍड. रविंद्र पवार, एम. बी. शेख, के. के. घाडगे, प्राचार्य आर. डी. गायकवाड, राजेंद्र फाळके, ऍड. दिलावर मुल्ला, सहसचिव प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव संजय नागपूरे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार इत्यादी उपस्थित होते.








