नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
देशात कोरोना रूग्णांची संख्य़ा वाढत आहे. अशा परस्थितीमध्ये कोरोना लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आधी भारतीयांना ही लस देण्याची भूमिका घेतली आहे. भारतातील परिस्थितीचा विचार करुन दोन महिन्यानंतर पुन्हा निर्यातीचा विचार करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे जगातील अनेक देशांना लस मिळण्यास विलंब होत आहे. यावरुन अॅस्ट्राझेनेका कंपनीने सिरमला कायदेशीर नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना अदर पूनावाला म्हणाले आहेत की, भारतात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. यामुळे पुढील दोन महिने देशातील मागणी पूर्ण करण्यावर भर राहणार आहे. देशातील रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दोन महिन्यांनी जूनमध्ये लसीची निर्यात सुरू करण्याचा विचार करण्यात येईल.
अॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे उत्पादन सिरम करीत आहेत. अनेक देश कोरोना लसीसाठी सिरमवर अवलंबून आहेत. परंतु, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी सिरमला लसीची निर्यात थांबवावी लागणार आहे. याचा फटका अनेक देशांतील कोरोना लसीकरणाला बसणार आहे. या लसीच्या निर्यातीसंदर्भात अनेक देशांशी करार झाले आहेत. आता अनेक देशांना ही लस मिळण्यास विलंब होत असल्याने अॅस्ट्राझेनेकाने सिरमला कायदेशीर नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.
Previous Articleआधार सोशल फाऊंडेशनतर्फे ‘देवदूतांचा’ सन्मान
Next Article …ही दिल्लीकरांची इच्छा : जयंत पाटील









