मराठी सिनेमातील एक खळखळून हसवणारं रसायन म्हणजे अशोक सराफ. इंडस्ट्रीत सगळेजण त्यांना अशोकमामा म्हणतात. त्यांच्या बोटात एक अंगठी आहे. साधीशीच चांदीची नटराजची कोरीव प्रतिमा असलेली. या अंगठीचा किस्सा अशोकमामांनीच शेअर केला. 1974 साली बोटात घातलेली ही चांदीची अंगठी अशोकमामांनी गेल्या 45 वर्षात एकदाही काढलेली नाही. याचं कारण म्हणजे त्यांच्यासाठी ही अंगठी लकफॅक्टर आहे.
त्यांचा विजय लवेकर नावाचा एक मित्र मेअअपमन म्हणून काम करायचा. त्याचं चांदीकाम व सराफाची छोटी पेढीही होती. एकदा त्याने बनवलेल्या काही अंगठय़ा घेऊन तो स्टुडिओत आला. अशोकमामांना म्हणाला यातली एक अंगठी सिलेक्ट कर. अशोकमामांनी हाताला लागणारी पहिलीच अंगठी घेतली आणि अनामिकेत चढवली. अगदी सोनाराकडे माप देऊन बनवावी इतकी ती मामांच्या बोटात सहजपणे आली. त्यावर नटराजाची प्रतिमा कोरली आहे. अंगठी बोटात घालून तिच्याकडे निरखून पाहत अशोक मामा विजयला म्हणाले की आता ही अंगठी माझी. अंगठी मामांना आवडली तो विषय तिथे संपला होता खरंतर.
पण त्यानंतर तीन दिवसांनी असं काहीतरी झालं की त्या चांदीच्या अंगठीविषयी अशोकमामांच्या भावनाच बदलून गेल्या. तोपर्यंत मामांची कारकीर्द चाचपडत सुरू होती. अंगठीचा किस्सा झाल्यानंतर तिसऱया दिवशी अशोक मामांना पांडू हवालदार या सिनेमाची ऑफर आली. अशोकमामांच्या सिनेकारकीर्दीतील पांडू हवालदार हा सिनेमा मैलाचा दगड आहे. या सिनेमाने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यांच्याकडे येणाऱया सिनेमांची आणि ते सिनेमे बॉक्सऑफीसवर हिट होण्याची घोडदौड सुरूच राहिली. हा किस्सा सांगताना अशोकमामा असंही म्हणतात की श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, पण ही अंगठी बोटातून काढायचीच नाही असं मी ठरवलं. गंमत म्हणजे, एकदा एका सिनेमात अशोकमामांना भिकारीची भूमिका करायची होती. अंगठी तर काढायची नाही आणि भिकारीच्या भूमिकेला तर न्याय द्यायचा असा प्रश्न जेव्हा अशोकमामांपुढे उभा राहिला तेव्हा त्यांनी अंगठीवरचा नटराजप्रतिमा असलेला जाडभाग तळहाताकडे वळवला आणि नुसती रिंग वरच्या बाजूला केली. यामुळे प्रश्नही सुटला आणि अंगठी बोटावेगळीही झाली नाही. थोडक्मयात काय, अशोकमामांची ही अंगठी म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे.
निवेदिता यांच्यासोबत अशोक मामांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा निवेदिता यांनी मामांना सोन्याची अंगठी भेट दिली. लग्नानंतरच्या काही दिवसात ती हरवली, पण गेल्या 46 वर्षांपासून बोटात असलेली चांदीची लकी अंगठी मात्र मामा जीवापाड जपतात.









