रत्नागिरी :
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात महिलांसाठी एक विशेष आरोग्य अभियान सुरू करण्यात येत आहे. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या नावाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, उपचार, समुपदेशन सेवा मोफत पुरविल्या जाणार आहेत.
या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे, त्यांना जागरूक करणे आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे हा आहे. या शिबिरांमधून महिलांना गंभीर आजारांचे लवकर निदान करून वेळेवर उपचार सुरू करता येतील.
या विशेष अभियानात स्तन व गर्भाशय कर्करोगाची प्राथमिक तपासणी, रक्तदाब व मधुमेहाची तपासणी, रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी आणि असंसर्गजन्य आजारांची तपासणी यांचा समावेश आहे. याशिवाय, असुरक्षित महिलांसाठी क्षयरोगाची तपासणी, मासिक पाळी स्वच्छता आणि पोषणविषयक जनजागृती, तसेच सामान्य आरोग्य समस्यांवर उपचार आणि समुपदेशन सेवाही उपलब्ध असतील.
जिल्ह्यातील महिलांना या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हा रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालये, ९ ग्रामीण रुग्णालये, ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३७८ उपकेंद्रांमध्ये या शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. १७ सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी आणि उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे या अभियानाचे उद्घाटन होणार आहे.
महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी नोंदणी करायची असल्यास आधारकार्ड, रेशनकार्ड आणि आधारला लिंक असलेला मोबाईल सोबत ठेवावा. तसेच, आयुष्मान कार्डसाठी आधारकार्ड आणि लिंक असलेला मोबाईल आवश्यक आहे
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या घरातील महिलांना या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे आवाहन केले आहे.
- विशेष सेवा..
▶ किशोरवयीन मुली व महिलांसाठी अशक्तपणाची तपासणी.
▶ प्रसूतपूर्व काळजी तपासणी, गर्भधारणेदरम्यान पोषण व काळजीबाबत समुपदेशन.
▶ माता-बाल संरक्षण कार्डचे वितरण आणि बालकांना लसीकरण
▶ रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे.








