खेड :
तालुक्यातील होडखाड–वरचीवाडी येथील रहिवासी व सध्या कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत गणपत शिगवण (30) या तरुणाचा गुरुवारी रात्री कुर्ला–मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. या तरुणाचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या अकाली निधनाने शिगवण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावावरही शोककळा पसरली आहे.
होडखाड–वरचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत शिगवण याचा डिसेंबरमध्ये तुंबाड येथील तरुणीशी विवाह झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने रंगवत विवाह सोहळ्यानंतर कामानिमित्त मुंबईला गेला होता. कामावरुन परतत असताना त्याचे कुर्ला येथे अपघाती निधन झाले. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटवणे रेल्वे पोलिसांना अशक्य बनले होते. अखेर अपघातस्थळी पडलेल्या ओळखपत्रावरून ओळख पटवण्यात यश आले. यानंतर तरुणाच्या नातेवाईकांना कळवण्यात आले. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेत रात्रीच गाव गाठले. पतीचा मृतदेह पाहून पत्नीसह आईने फोडलेल्या हंबरड्याने साऱ्यांचेच डोळे पाणावले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास तरुणावर नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई–वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.
- साईबाबा पालखी महोत्सव उद्या साध्या पद्धतीने
होडखाड–वरचीवाडी येथे 6 एप्रिल रोजी श्री साईंच्या पालखी महोत्सवासह साई भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाची ग्रामस्थांकडून जय्यत तयारीही करण्यात आली होती. सुशांत शिगवण या तरुणाच्या अकाली निधनाने ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. यामुळे साईबाबा पालखी महोत्सव व साई भंडारा उत्सव साध्या पद्धतीनेच साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.








