बेळगाव : खानापूर तालुक्यातील करिकट्टी येथील शेतकरी गेल्या 70 वर्षांपासून सर्व्हे क्रमांक 8 मधील 65 एकर 24 गुंठे जमीन कसत आहेत. मात्र 2019 मध्ये त्यांची नावे सदर सर्व्हे क्रमांकातून हटविली असून त्याठिकाणी राखीव वन्यप्रदेश म्हणून नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपली नावे पुन्हा नोंद व्हावीत, यासाठी फॉर्म 59 भरून दिला आहे. मात्र काही दिवसांपासून संबंधित विभागात तांत्रिक बिघाडामुळे संगणक सुरू नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याची मागणी नेगील योगी शेतकरी सेवा संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
गेल्या 70 वर्षांपासून येथील शेतकरी सुमारे 65 एकर 24 गुठे जमीन कसत आहेत. यावरच ते उदरनिर्वाह चालवत आहेत. मात्र 2019 मध्ये अचानक सरकारकडून शेतकरी कसत असलेल्या सर्व्हे क्रमांक 8 शेतजमिनीवर वनविभागाची राखीव जमीन म्हणून नोंद करण्यात आली असून शेतकऱ्यांची नावे हटविण्यात आली आहेत. यानंतर प्रशासनाकडून संबधित शेतकऱ्यांना फॉर्म क्रमांक 59 भरून देण्याची सूचना देण्यात आली होती. यानंतर शेतकऱ्यांनी फॉर्म दिला होता. सरकारने शेतकऱ्यांची नावे नोंद करण्याची सूचना संबंधित विभागाला दिली होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांची नावे नोंद करण्यात अडचणी येत असून ही समस्या त्वरित सोडवून शेतकऱ्यांना अनुकूल करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.









