पावसाअभावी धबधबे कोरडे, चिंब भिजण्यासाठी पावसाची प्रतीक्षा
बेळगाव : वर्षापर्यटनाचे वेध अनेकांना लागून राहिले आहेत. मात्र यावर्षी पाऊस लांबणीवर पडल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. जुलै महिना उजाडला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे धबधबेदेखील ओस पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस होतो. त्यामुळे सर्वत्र नदी-नाले प्रवाहित होऊन धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळतात. मात्र यंदा जुलैचा पहिला आठवडा आला तरी म्हणावा तसा पाऊस नसल्याने धबधबे कोरडे पडले आहेत. यंदा वळीव पावसाबरोबरच मान्सूननेदेखील पाठ फिरविली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई गंभीर बनू लागली आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होतो. त्यानंतर दमदार पावसाला सुरुवात होते. जुलै पहिल्या आठवड्यापासून पर्यटक वर्षापर्यटनासाठी बाहेर पडतात. मात्र यंदा जुलै महिना आला तरी उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. बेळगाव परिसरातील पर्यटक आंबोली, सुंडी, किटवाड, पारगड यासह लहान धबधब्यांवर गर्दी करतात. विशेषत: अलीकडे शहरापासून अगदी जवळ असलेल्या सुंडी आणि किटवाडच्या धबधब्यावर गर्दी वाढू लागली आहे. मात्र पावसाअभावी हे धबधबेदेखील अद्याप ओस पडले आहेत. पाऊस नसल्याने शेतीकामेही रखडली आहेत. जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर नदी, नाले, ओढ्यांना पाणी येणार आहे. त्यानंतरच धबधबे हळुहळू प्रवाहीत होणार आहेत. त्यामुळे यंदा पर्यटकांना चिंब भिजण्यासाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.









