कोल्हापूर / इम्रान गवंडी :
कोल्हापुरातील रविवार पेठ येथील मणेर कुटूंबीयांनी बकरी ईदसाठी तब्बल 1 लाख 70 हजार रूपये किंमतीचे एक बकरे आणले आहे. या बकऱ्याचे वजनही तब्बल 150 किलोच्या पुढे आहे. राजस्थान येथील गुजरी या जातीचे बकरे असुन मुंबईच्या देवणार बाजारातून याची खरेदी केली आहे. रोज याला पाच लिटर दूध व एक किलो काजू, बदामचा खुराख द्यावा लागत असल्याची माहिती हाजी खलील मणेर यांनी ‘तरूण भारत संवाद’ला दिली.
कोल्हापूर म्हंटलं की हौसेला मोल नाही असेच समकिरण. प्रत्येक गोष्टीत वेगळेपण हे एक कोल्हापुरातचे खास वैशिष्ट्याच म्हणावे लागेल. असेच एक वैशिष्ट्या बकरी ईद निमित्त पहायला मिळत आहे. मणेर कुटुंबीयांकडून दरवर्षी 100 किलोच्या आसपास एक बकरे आणले जाते. यंदा आणलेले हे बकरे सर्वात महाग व वजनानेही अधिक असल्याचे हाजी मणेर यांनी सांगितले. याची उंची साडेपाच फुटापर्यंत आहे. तर लांबी सुमारे साडेसहा फुट आहे. याला पाहण्यासाठी दिवसभर गर्दी होत आहे. याची प्रत्येकाला भुरळ पडत असुन त्याची आठवण मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध करण्याचा मोह आवरत नाही.
पवित्र बकरी ईद म्हणजे त्यागाचे प्रीतक आहे. ईदला कुर्बानी दिलेल्या बकऱ्यातील 50 टक्के वाटा गरीबांना व उर्वरित पै पाहूण्यांच्यात दिला जातो. जेवढे वजन जास्त तेवढे वाटप जादा करता येते. त्यामुळे अधिक मोठे बकरे आणण्याकडे सर्वांचा कल अधिक असतो. कोल्हापुरात अनेकजणांकडून सुमारे लाखभर रूपये किंमतीचे बकरे खरेदी केली जातात. अनेकजण मोठे बकरे घेण्याला अधिक पसंती देतात. कोल्हापुरात बकरी ईदसाठी सुमारे 20 कोटी रूपयापर्यंत उलाढाल होते. कर्नाटकातील रायबाग येथील बकरी बाजार प्रसिद्ध आहे. या ठिकाणहून अधिक प्रमाणात खरेदी केली जाते.
- निवृत्त डीवायएसपींना भुरळ
निवृत्त पोलीस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांनीही मणेर कुटुंबीयांची भेट घेत या बकऱ्याची उत्सुकतेने माहिती घेतली. बकऱ्याला पाहून त्यांनाही त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मोबईलमध्ये त्याची आठवण साठवून ठेवली. पोलीस उपअधिक्षक पाटील यांनाही बकऱ्याची भुरळ पडली.
- देखभालीसाठी विशेष लक्ष
पालन पोषणाचा महिन्याचा खर्च हजारो रूपयापर्यंत आहे. याची देखभाल करण्यासाठी इब्राहिम मणेर, रशिद मणेर, साजिद मणेर यांच्या सर्व कुटूंबीयांसह ताहिर मुजावर विशेष लक्ष देत आहेत. रोज सकाळी–संध्याकाळी फिरायला नेण्यासह त्याच्या खाण्यापीण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. याला ठेवण्यासाठी खास रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. राजस्थान ते मुंबई व तेथून कोल्हापूर असा दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून हे बकरे आणले आहे.








