लहान गावांच्या पाणी योजना सौरउर्जेवर चालवण्याचे निर्देश
प्रतिनिधी/सांगली
पाणी पुरवठा योजनांची वीज बिले वेळेत न भरल्याने तसेच थकबाकीच्या प्रश्नामुळे अनेक पाणी योजना बंद आहेत. त्यामुळे जेथे जागा उपलब्ध आहे तेथे छोटय़ा गावांच्या नळपाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालवाव्यात. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावे, असे निर्देश देऊन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी 30 जूनअखेरपर्यंत प्रस्तावित नळपाणी पुरवठा योजनांचे कार्यादेश निर्गमित करण्याचे विभागाचे धोरण आहे, त्यामुळे यंत्रणांनी तातडीने आराखडे सादर करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिह्यातील नळपाणी पुरवठा योजनांबाबत माधवनगर रोड येथील शासकीय विश्रामगृह येथे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, प्रकल्प संचालक जलजीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) विजयसिंह जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एस. एम. कदम, उपकार्यकारी अभियंता बी. जे. सोनवणे उपस्थित होते.
गुलाबराव पाटील म्हणाले, जिह्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण 706 योजनांचे परिपूर्ण प्रकल्प आराखडे तयार केले आहेत. त्यापैकी 586 योजनांच्या कामांना तांत्रिक तर 485 कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निविदा जाहीर केल्या आहेत. 356 कामांना कार्यादेश देण्यात आले असून यातील 314 कामे सुरू आहेत. तर 42 कामे पूर्ण झाली आहेत. जिह्याचे जलजीवन मिशन अंतर्गत काम चांगले असले तरी या कामांवर झालेला खर्च तुलनेने कमी आहे. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येणाऱया कामांच्या निधी उपलब्धतेत केंद्राचा वाटा 50 टक्के, राज्याचा वाटा 50 टक्के व लोकवर्गणी 10 टक्के आहे. ही योजना 2024 पर्यंत राबविण्यात येणार असल्याने विहीत कालावधीमध्ये कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी यंत्रणांनी दर आठवडय़ाला कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा.
नळपाणी पुरवठा योजनांवर होणाऱया खर्चाचा ताळमेळ काटेकोरपणे घ्यावा. या योजनेच्या कामातील गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाहीत. अधिकाऱयांनीही योजनेशी संबंधित कामे मुदतीत पूर्ण करावीत, असे सांगून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील 26 योजना प्रस्तावित असून यातील 6 योजनांचे कार्यादेश दिले आहेत. या सर्व योजनांची कामेही गतीने सुरू करावीत, असे निर्देश यंत्रणांना दिले. पाणी हा विषय संवेदनशिल असल्याने पाणीपुरवठय़ाविषयी निवेदन घेवून येणाऱयांशी अधिकाऱ्यांनी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवावे अशी सूचनाही त्यांनी केली. नळपाणी पुरवठा योजनेतील कामांबाबत ज्या कंत्राटधारांचा पुर्वानुभव चांगला नाही त्यांना कामे देवू नयेत. जे कंत्राटदार कामे विहीत मुदतीत व गुणवत्तापूर्ण करू शकतील त्यानाच कामे द्यावीत.
मनपाच्या भुयारी गटार योजनेच्या कामाबद्दल नाराजी
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेकडील भुयारी गटार योजना कामांचा आढावा घेवून दीर्घ कालावधीनंतरही कामे वेळेत पूर्ण न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भुयारी गटार योजना, शेरीनाला, वारणा उद्भव योजनेतून पाणी पुरवठा योजना या विषयांबाबत मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले.








