उंब्रज, तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक बळी, अपघातांची मालिका सुरू
प्रवीण कांबळे/उंब्रज
पुणे बंगलोर आशियाई महामार्गाच्या रुंदीकरण प्रवाशांच्या जीवावर उठले आहे. पेरले ते कराड या २५ किलोमीटरच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून अनेकांचे बळी गेले आहेत तर अनेकजण जायबंदी झाले आहेत. येथे डीपी जैन कंपनीकडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आला आहे. तसेच महामार्गाला खेटून सिमेंटचे ठोकळे उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक धीर गंभीर अपघात झाले आहेत. रुंदीकरणाचे काम वाहतूक कोंडी पर्यंत ठीक होते मात्र अपघातांची मालिकाच सुरू झाल्याने महामार्गावर नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महामार्गाचे जीव घेणे रुंदीकरण एवढ्या घाईगडबडीत का? असा सवाल सध्या निर्माण झाला असून तळबीड येथील अपघात एकाचा मृत्यू झाल्याने यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तक्रार अर्जही तळबीड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पंरतु प्रशासन चुप असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उलट सहापदरीकरणाचे काम हाती घेणाऱ्या कंपनीचीच दहशत सध्या महामार्गावर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
सद्यस्थितीत सातारा ते कराड मार्गावर सहापदरीकरणाच्या अनुषंगाने रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काम सुरू झाल्यापासून मागील चारसहा महिन्यात मोठ्या प्रमाणावर अपघात सुरू आहेत. उंब्रज, कोर्टी, वराडे, वहागाव, तळबीड, तासवडे व कराड पर्यंतच्या अनेक अपघात झाले आहेत. या परिसरात सुरक्षा रेलींग, सुरक्षा पट्टे व इतर साधनसामग्री वापरण्याऐवजी रस्त्याकडेला अवजड सिमेंटचे ठोकळे उभे करण्यात आले आहेत. या ठोकळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. 15 ऑगस्ट रोजी कोर्टी तालुका कराड गावच्या हद्दीत कार सिमेंटच्या ठोकळ्याला धडकून नाल्यासाठी केलेल्या खोदकामात आदळली यामध्ये चौघेजण जायबंदी झाले आहेत. त्यानंतर आठवड्याभरातच येथे पुन्हा दुसरा अपघात झाला. त्यापूर्वी वराडे येथे कांबळे वस्ती जवळ दुचाकी स्वार सिमेंटच्या कठड्याला धडकून ठार झाला आहे. तर १० सप्टेंबर रोजी शिवडे येथील गणेश ढाबासमोर आयशर टेम्पो नाल्यासाठी खोदलेल्या खड्यात घुसला. तर शिवडेतील ठाकूर ढाबा येथे सोमवारी 11 सप्टेंबर रोजी रस्ता रुंदीकरणाच्या खोदकामात आदळून ट्रकला अपघात झाला. तसेच त्याच दिवशी सकाळी वराडे येथे हॉटेल शिवराय नजीक एका 45 पेक्षा व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर १० सप्टेंबर रोजी तळबीड ता. कराड येथील भराव पुलावर विनाकारण ठेवलेल्या सिमेंटच्या ठोकळ्याला धडकून मलकापूर येथील दुचाकीस्वार ठार झाला असून या दुचाकी स्वाराच्या भावाने डीपी जैन कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान वहागाव, वनवासमाची, बेलवडे हवेली, येथे अनेक धीरगंभीर अपघात गेल्या चार सहा महिन्यात झाले आहेत. यामध्ये अनेकांना जीवास मुकावे लागले आहे तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. मात्र या अपघातांना जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे? येथे डीपी जैन कंपनीच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र कामाचे कोणतेही नियोजन नसल्याने पुरता फज्जा उडाला आहे. पावसाळ्याचे दिवस असतानाही रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले असून पाऊस पडत नाही याचा गैरफायदा घेत संबंधित कंपनीने कामाची घाई गडबड सुरू केली मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघातांची मालिका सुरू आहे.
सद्यस्थितीत महामार्ग कडेला अनियोजितपणे खोदकाम करून सिमेंटचे ठोकळे उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे भीषण अपघात घडत आहेत. घाईगडबडीत केलेल्या खोदकामांमध्ये वाहने पलटी होऊन भीषण अपघात सुरू आहेत मात्र याचे कोणतेही सोयरे सुतक संबंधित काम करणारे कंपनीला नसल्याचे दिसून येत आहे. देखरेख विभाग, प्राधिकरण विभागाचे अधिकारीही चुप आहेत. पोलीस अपघाताचा पंचनामा करून कागदोपत्री काम करीत आहेत मात्र अनेकांचे हकनाक बळी जात असून यांना जबाबदार कोण? या अपघातांबाबत सगळी व्यवस्था चिडीचूप असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.









