कोल्हापूर :
राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ शपथविधी रविवारी पार पडला. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ, शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर आणि पुणे जिह्यातील कोथरूडचे आमदार आणि कोल्हापूरचे सुपूत्र चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिह्यात तीन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत. आता जिह्याचे पालकमंत्री कोण होणार ? याकडे जिह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. यापूर्वी हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी जिह्याचे पालकमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडून पालकमंत्री पदासाठी पुन्हा प्रयत्न सुरु आहेत. तर जिह्यातील आमदारांच्या संख्याबळावर पालकमंत्री पद देण्याचा निर्णय झाल्यास आबिटकर यांना डबल लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेली अडीच वर्षे कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जिल्हा नियोजनच्या निधी वाटपात समतोल साधण्याचा प्रयत्न केला. महायुती म्हणून युतीच्या सर्व स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. तसेच एक ज्येष्ठ, अभ्यासू नेते म्हणून मंत्री मुश्रीफ यांचा पालकमंत्री पद देण्यासाठी विचार झाल्यास त्यांना अन्य घटक पक्षांच्या नेत्यांकडून हिरवा कंदिल दिला जाऊ शकतो.
जिह्यात भाजपची ताकद आणखी वाढविण्यासाठी भाजपकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पद दिले जाऊ शकते. जिह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकाराच्या राजकारणात भाजपचे सामर्थ्य वाढवून काँग्रेसला पुन्हा एकदा शह देण्यासाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांचे महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्यामुळे चंद्रकांतदादांकडे पालकमंत्री पद देण्यासाठी विरोध होण्याची शक्यता कमी आहे.
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गेल्या दहा वर्षात राधानगरी विधानसभा मतदारसंघाबरोबरच जिह्यातील अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कोणताही प्रश्न असो, अथवा योजना, त्या मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा करण्यामध्ये त्यांचा हातकंडा आहे. त्यामुळेच राधानगरी मतदारसंघातून जनतेने त्यांना हॅटट्रिक करण्याची संधी दिली. शिवसेनेचे जिह्यातील आमदारांचे संख्याबळ पाहता अन्य घटक पक्षांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर आमदारांच्या संख्येवर पालकमंत्री पद देण्याचा निर्णय झाल्यास आबिटकर हे जिह्याचे पालक होतील.








